प्रतिनिधी / रत्नागिरी
गावठी हातभट्टीची विनापरवाना वाहतूक करणाऱया दोघांना राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एकूण 510 लीटर दारू आणि मारुती अल्टो कार असा 1 लाख 26 हजार 550 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्कने दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई 25 मे रोजी रात्री निवळी ते जयगड मार्गावरील चाफे तिठय़ानजीक करण्यात आली. यामध्ये मिनार रायबा पाटील (रा. मिरजोळे पाटीलवाडी, रत्नागिरी) व शुभम सुरेश वरेकर (रा. मजगाव, किर्तीनगर, ता. जि. रत्नागिरी) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दारूने भरलेल्या 7 रबरी टय़ुब व 7 पॅन सापडले आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार, रत्नागिरीचे अधीक्षक डॉ. व्ही. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक शरद जाधव, जवान मानस पवार, वैभव सोनवणे यांनी केली.