कापडवंजमध्ये काँग्रेससमोर आव्हान
‘आप’च्या एंट्रीमुळे वाढली चुरस
गुजरातच्या खेडा जिल्हय़ातील कापडवंज मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. येथे मागील दोन निवडणुकांमध्ये काँगेसचा उमेदवार विजयी झाला आहे. परंतु यावेळी आम आदमी पक्षाच्या एंट्रीमुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघात परमार, डाभी, पटेल आणि झाला समुदायाचा दबदबा आहे.
या मतदारसंघात भाजपने राजेश कुमार मगनभाई झाला यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने कांतिभाई राजीभाई डाभी यांना मैदानात उतरविले आहे. गुजरातमध्ये राजकीय प्रभावाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या आम आदमी पक्षाने मनुभाई पटेल यांना उमेदवारी दिली ओ. या मतदारसंघात परमार समुदायाच्या मतदारांची संख्या 14 टक्क्यांपेक्षा आहे. तर डाभी समुदायाचे मतदार 9.9 टक्के इतके आहेत. याचबरोबर पटेल अन् झाला समुदायाची हिस्सेदारीही प्रत्येकी 9 टक्के आहे.
2017 च्या निवडणुकीत काँग्रेसचे कलाभाई राजीभाई डाभी यांनी 85 हजार 195 मते प्राप्त करत विजय मिळविला होता. भाजपचे कनुभाई भूलाभाई डाभी यांना त्यांनी पराभूत केले होते. 2012 च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार म्हणून शंकरसिंह वाघेला हे विजयी झाले होते. त्या निवडणुकीत भाजप उमेदवाराने लक्षणीय मते मिळविली होती.
निवडणूक जिंकण्यासाठी केवळ नावच पुरेसे
लेडी डॉनचा पुत्र समाजवादी पक्षाचा उमेदवार
लेडी माफिया डॉन संतोकबेन सरमनभाई जडेजा यांचा पुत्र कांधल जडेजा हे समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. गुजरात विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आमचे केवळ नावच पुरेसे असल्याचा दावा कांधल यांनी केला आहे. पोरबंदर जिल्हय़ातील कुटियाना मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत. कांधल यांनी अलिकडेच उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला होता.
गॉडमदर चित्रपट
शबाना आझमी यांचा 1999 मध्ये प्रदर्शित चित्रपट ‘गॉडमदर’ हा संतोकबेन सरमनभाई जडेजा यांच्या आयुष्यावर आधारित होता. लेडी डॉन 1990-95 पर्यंत कुटियानाच्या आमदार राहिल्या आहेत. पोलिसांनुसार संतोकबेन यांच्या विरोधात स्वतःचे पती सरमन मंजा जडेजा यांच्या 14 मारेकऱयांच्या हत्येशिवाय 500 हून अधिक गुन्हे नोंद होते.
मी माझ्या आईचा वारसा पुढे नेत आहे. एका राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवतोय का अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार यामुळे कुठलाच फरक पडणार नाही. माझ्या कामामुळे लोक मते देत असल्याने मीच विजयी होईन असे कांधल यांचे म्हणणे आहे. जडेजा यांनी 2012 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून कुटियाना मतदारसंघात विजय मिळविला होता. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीवेळी काँग्रेससोबत आघाडी केली होती.
80-90 च्या दशकातील भय
लोक भीतीपोटी का प्रेमापोटी मत देतात अशी विचारणा जडेजा यांना त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी विचारात घेत करण्यात आली होती. जर तुम्ही मला 80-90 च्या दशकात हा प्रश्न विचारला असला तर मी निश्चितच ‘भीती’मुळे लोक मतदान करत असल्याचे सांगितले होते. परंतु आता मतपत्रिका नसून ईव्हीएम आहे. माझ्या कामामुळे लोक मलाच मत देतात. मी माझे पूर्ण जीवन येथे घालविले आहे. येथे माझा एक मोठा परिवार आहे. हे माझ्या आईचे गाव आहे असे कांधल यांनी म्हटले आहे.
रक्कम हस्तगत होताच काँग्रेस नेत्याचे पलायन
सूरतमध्ये घडला प्रकार : व्हिडिओ झाला व्हायरल
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. यादरम्यान निवडणूक आयोगाची पथके सातत्याने रोख रक्कम जप्त करत आहेत. सूरतच्या महिधरपुरा भागात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने इनोव्हा कारमधून 75 लाख रुपये हस्तगत केले आहेत. ज्या ठिकाणी ही कारवाई झाली, तेथील सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.
या व्हिडिओत काँग्रेस नेते बी.एन. संदीप हे अटक होण्याच्या भीतीने पळ काढताना दिसून येत आहेत. सूरतच्या महिधरपुरा भागातील जदाखाडी येथे इनोव्हा कारमधून रोख रक्कम हस्तगत करण्यात आली होती. या कारमध्ये बी.एन. संदीप यांच्या नावाचा व्हीआयपी पार्किंग पासही सापडला आहे.
इनोव्हा कारमधील उदय गुर्जर अन् कारचा चालक फेज मोहम्मद यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. उदय गुर्जर हा राजस्थान काँग्रेसशी जोडला गेलेला आहे. प्राप्तिकर विभागाचे पथक सध्या हस्तगत रकमेसंबंधी तपास करत आहे. तसेच काँग्रेस नेते बी.एन. संदीप यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी 11 नोव्हेंबर रोजी गुजरातमध्ये 71.88 कोटी रुपयांची रोख रक्कम, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आणि अन्य सामग्री जप्त करण्यात आली होती. 64.56 कोटी रुपयांच्या वस्तू मतदारांना मोफत वाटल्या जाणार होत्या. तसेच 17.50 कोटी रुपयांचे मद्यही जप्त करण्यात आले आहे. 1.25 कोटी रुपये मूल्याचे अमली पदार्थही ताब्यात घेण्यात आले आहेत.
त्रिकोणी लढत पाहता काँग्रेस सतर्क आम आदमी पक्षावर जोरदार टीकास्त्र
गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत त्रिकोणी लढत पाहता काँग्रेसना आता आम आदमी पक्षाच्या विरोधात आक्रमक प्रचाराची मोहीम गतिमान करण्याचे धोरण स्वीकारले आहे. निवडणूक प्रचारारदरम्यान ‘आप’ला भाजपची बी टीम संबोधिणाऱया काँग्रेसने आता आम आदमी पक्षाला मते खाणारा पक्ष म्हणवून हिणविण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारांसह सर्व स्थानिक नेत्यांना प्रचार मोहिमांदरम्यान आम आदमी पक्षाच्या राजकीय गांभीर्याच्या दाव्याला पोकळ सिद्ध करण्याची कुठलीच संधी न सोडण्याचा सल्ला वरिष्ठ स्तरावरून देण्यात आला आहे.
मुख्य लढत भाजप अन् काँग्रेसमध्येच
गुजरात निवडणुकीतील आतापर्यंतच्या वातावरणानुसार ग्रामीण भागांमधील स्वतःचे बालेकिल्ले असलेल्या काही मतदारसंघांमध्ये आम आदमी पक्ष नुकसान पोहोचवू शकतो तर अनेक शहरी मतदारसंघांमध्ये आपमुळे भाजपची समीकरणे बिघडणार असल्याचे काँग्रेसचे मानणे आहे. राज्यात भाजपला पर्याय ठरण्याचा आम आदमी पक्षाचा फोल ठरला असून मुख्य लढत भाजप अन् काँग्रेस यांच्यातच असल्याचे काँग्रेसच्या निवडणूक व्यूहनीतिकारांचे मत आहे.
‘आप’च्या एंट्रीमुळे रंगतदार स्थिती
भाजपचे सुपरस्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अनेक नेत्यांचा प्रचारादरम्यान काँग्रेसवर केला जाणारा शाब्दिक हल्ला हा आम आदमी पक्षाकडून मोठे आव्हान निर्माण करण्यात आले नसल्याचे संकेत देणारा आहे. भाजप अन् काँगेसमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता पाहता आम आदमी पक्षाच्या उमेदवारांच्या उपस्थितीमुळे काही मतदारसंघांमधील राजकीय समीकरण बदलणार आहे. पंचमहल-दाहोद यासारखे आदिवासी ग्रामीण भाग, उत्तर गुजरातमधील काही ग्रामीण मतदारससंघांमध्ये आप उमेदवार उभे असल्याने काँग्रेसला नुकसान होऊ शकते. याचा लाभ भाजपला मिळू शकतो असे एका नेत्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले आहे.
राजकीय समीकरणांवर प्रभाव
सूरत, वडोदरा आणि अहमदाबाद यासारख्या मोठय़ा शहरी भागांमध्ये भाजपचा मजबूत प्रभाव आहे. येथील काही मतदारसंघांमध्ये आप उमेदवारामुळे समीकरणे बदलू शकतात. तरीही ‘आप’संबंधी काँग्रेस कुठल्याही प्रकारची राजकीय नरमाई घेण्याच्या तयारीत नाही. प्रचार मोहिमत राज्यातील भाजप सरकारवर नाराज लोकांची मते विभागून आम आदमी पक्ष भाजपला राजकीय लाभ मिळवून देत असल्याचा मुद्दा काँग्रेसकडून मांडला जात आहे.
काँग्रेसची मोदींसमोर शरणागती
एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी गुजरातमध्ये प्रचारसभांचा धडाका लावला आहे. त्यांनी एका सभेत बोलताना काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मागील 27 वर्षांपासून होत असलेल्या भाजपच्या विजयासाठी काँग्रेसच जबाबदार आहे. नरेंद्र मोदी हे 27 वर्षांपासून काँग्रेसला चहा पाजवून निवडणुकीत पराभूत करत आहेत. एआयएमआयएम हा मते विभागणारा नव्हे तर गुजरातच्या गरीबांना त्यांचे अधिकार मिळवून देणारा पक्ष असल्याचा दावा ओवैसी यांनी केला आहे.
राज्यातील 182 पैकी आमचा पक्ष केवळ 13 जागा लढवत आहे. या 13 जागांवर आम्हाला विजय मिळेल अशी अपेक्षा आहे. काँग्रेसचे नेते ओवैसी चिथावणीपूर्ण भाषणे करत असल्याचे म्हणतात. भारताच्या पंतप्रधानांच्या चुका सांगणे, त्यांच्या 15 लाख रुपयांच्या खोटय़ा आश्वासनाबद्दल बोलणे म्हणजे प्रक्षोभक भाषण नव्हे. परंतु काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर शरणागती पत्करली असल्याने त्यांच्या विरोधात बोलणार नाहीत. काँग्रेसला गरीबांचे दुःख जाणवत नसल्याची टीका ओवैसी यांनी केली आहे. एमआयएमआयएमचे एक उमेदवार शाहनवाज खानने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शाहनवाज यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या एक दिवसापूर्वी ओवैसी यांनी त्यांच्यासाठी जाहीर सभा घेतली होती. या सभेला मोठी गर्दी झाली होती. तरीही शाहनवाज यांनी काँग्रेस प्रवेश केला होता. यावर ओवैसी यांनी काँग्रेसने शाहनवाज यांना खरेदी केल्याचा आरोप केला आहे.