चैत्र महिन्यात घरोघरी चैत्रगौर स्थापन : घरापुरताच पन्हे, कोशिंबीरचा आस्वाद
प्रतिनिधी / बेळगाव
चैत्र महिन्यात घरोघरी चैत्रगौर स्थापन झाली. घरापुरतीच पन्हे, कोशिंबीरही झाली. परंतु बेळगावच्या समस्त महिलांचा लाडका चैत्रोत्सव यंदा झाला नाही. या चैत्रोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता आला नाही आणि पन्हे, कोशिंबीरही चाखता आली नाही.
कोरोनामुळे बेळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रावर विरजण पडले आहे. शारदोत्सव सोसायटीने दर महिन्याला एक सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचे ठरविले आणि त्यासाठी ऑनलाईन आणि झूमचे माध्यम शोधले. परंतु प्रत्यक्ष एकत्र येण्याचा आनंद विरळाच. बेळगावमध्ये चैत्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा होतो. घरोघरी चैत्रोत्सवाचे आमंत्रण दिले जाते.
चैत्रोत्सव हा महिलांच्या कल्पकतेला, कौशल्याला वाव देणारा महिना. कारण याच निमित्ताने महिला घरासमोर किंवा चैत्रगौरीसमोर चैत्रांगण रेखाटतात. यंदा त्यांची ही कला घरापुरतीच मर्यादित राहिली. चैत्रांगणमध्ये 64 हून अधिक प्रतीक चिन्हे रेखाटली जातात. चैत्रांगणमध्ये भारतीय संस्कृतीच्या विविध प्रतिकांचा उपयोग केला गेला आहे. या मागचा गर्भितार्थही मार्मिक आहे.
चैत्रांगण रेखाटताना प्रथम तोरण काढले जाते. म्हणजेच कोणत्याही शुभकार्याची सुरुवात तोरण लावून होते. त्यानंतर सर्व प्रतिके रेखाटली जातात. मखरात दोन मानवी प्रतिमा रेखाटल्या जातात. कोणी याला शिव-पार्वती तर कोणी लक्ष्मी-नारायण किंवा राम-सीतेची जोडी असे मानतात. काही जण अनुराधा-स्वाती ही सृजनाची नक्षत्रे असे समजून ही जोडी रेखाटतात.
हा महिना लाही लाही करणारा. म्हणून शितलतेसाठी पंखा रेखाटला जातो. प्रकाशाचे प्रतीक म्हणून सूर्य, चंद्र, विष्णूला प्रिय म्हणून शंख, चक्र, गधा, शुभ कार्याची देवता म्हणून गणपती, विद्येची देवता म्हणून सरस्वती, वंशवृद्धीचे प्रतीक म्हणून सवत्सधेनू, गायीचे प्रतीक म्हणून गोपद्म, कोमलतेचे प्रतीक म्हणून कमळ, लक्ष्मीची पावले, कासव, डमरु, शुभचिन्ह म्हणून स्वस्तिक, कलश, पावित्र्य असणारे श्रीफळ, सौभाग्याचे चिन्ह म्हणून हळदी-कुंकवाचे करंडे, फणी, मंगळसूत्र, श्रीकृष्णाला प्रिय असणारी बासरी आणि मोरपीस, समृद्धीचे प्रतीक असणारी अंबारी रेखाटली जाते. वात, पित्त आणि कफ हे त्रिगोशांचे शमन करणारा असा त्रिशूळ हा सुद्धा खूप सूचक आहे. चैत्रगौरीसमोर कल्पक अशी आरास करून तिच्यासमोर चैत्रांगण रेखाटले जाते. मात्र राम नवमीपासून अक्षय तृतियापर्यंत घराच्या प्रवेशद्वारासमोर अनेक महिला चैत्रांगण काढतात. ते पाहण्याचे निमित्त करून परस्परांची भेटही होत असे. आता मात्र मोबाईलद्वारे चैत्रांगणाचे फोटो व्हायरल होत राहिले. उन्हाळय़ात गारवा हवा म्हणून पन्हे केले जाते. त्याच्या सोबत कैरीचा खिस वापरून आंब्याची डाळ केली जाते. यानिमित्ताने रेशमी साडय़ा कपाटातून बाहेर येतात. परस्परांच्या भेटी होतात. चार घटका विरंगुळा मिळतो. चैत्रोत्सवामुळे गायन, नृत्य यांनाही बहर येतो. मात्र यंदा हे सर्व हुकल्याची हुरहुर महिलांना आहेच. परंतु त्या घरी घेऊन येणाऱया कोशिंबीरीची अधीरतेने वाट पाहणाऱया बालचमूंचाही हिरमोड झाला आहे.