कोलंबो
श्रीलंकेमध्ये अलीकडेच झालेल्या जहाजाच्या दुर्घटनेनंतर समुद्रातील शेकडो समुद्री जीवांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. कासवासह डॉल्फीनसह असंख्य मासे किनारी भागात मृतावस्थेत सापडल्याचे सांगितले जात आहे.
समुद्री जीवांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने प्राणीमित्र संघटनेने याबाबत संताप व्यक्त केला आहे. मेमध्ये एक्सप्रेस पर्ल हे जहाज रसायन घेऊन निघाले असता दुर्घटनाग्रस्त होऊन जहाजाला आग लागली होती. कोलंबोजवळ ही घटना घडली होती. जहाजाची आग पाच दिवसानंतर आटोक्यात आली होती. या घटनेनंतर समुद्रात 176 कासवांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यासोबत 23 डॉल्फीनचा आणि चार व्हेल माशांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एक्सप्रेस जहाजात 278 टन इतके इंधन तेल व 50 टन गॅस तेल होते. यात पुन्हा नायट्रिक ऍसिडसह इतर रसायने, सौंदर्यप्रसाधनेही होती असे सांगितले जाते. समुद्रात मिसळलेल्या घातक रसायनामुळे माशांसह वरील जलचरांचा मृत्यु होण्याची ही दुखद बाब असल्याचे पर्यावरण तज्ञांनी म्हटले आहे.