बिहारच्या निवडणुकीनंतर ठरणार तारीख : बिहार निवडणूक – कोरोना संबंधांवर लक्ष
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील जिल्हा पंचायत आणि नगरपालिका निवडणुका एकाचवेळी घेण्याचा इरादा असून बिहार निवडणुकीनंतरच त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान पणजी महापालिका निवडणूक 28 फेब्रुवारी रोजी घेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
राज्यातील नगरपालिकांची मुदत 4 नोव्हेंबर 2020 रोजी संपुष्टात येत आहे. मुदत संपलेल्या पालिकांवर प्रशासक नियुक्त करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या संदर्भात या आठवडय़ातच सरकार निर्णय घेईल. राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाशीही संपर्क साधला आहे.
जिल्हा पंचायतीच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात होत्या. तरीही आता जवळपास सर्वच क्षेत्रातील लॉकडाऊन उठविण्यात आल्याने तसेच बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर करून प्रत्यक्षात प्रक्रियादेखील सुरू झाल्यामुळे राज्यातील जिल्हा पंचायत व पालिकांच्या निवडणुका घेण्याची मागणी वाढत आहे.
बिहारातील निवडणुकीवर लक्ष
या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने बिहारमधील निवडणुकीवर लक्ष ठेवलेले आहे. तिथे कशाप्रकारे निवडणूक प्रक्रिया होते व त्यातून कोविडवर कोणता परिणाम होतोय, याबाबतची सारी माहिती निवडणूक आयोग मिळविणार आहे. तसेच सामाजिक सुरक्षित अंतर राखण्याबाबतही बिहारमध्ये कोणत्या नियमांचे पालन केले जाते याचा सारा अभ्यास करून नंतरच राज्यातील जिल्हा पंचायत व पालिका निवडणुका घेतल्या जाणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी त्यास दुजोरा दिला.
एकाच खर्चात दोन निवडणुका
दोन जिल्हा पंचायती व 12 पालिकांच्या निवडणुका एकाचवेळी घेतल्या जाणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त त्याबाबत गांभिर्याने विचार करीत आहेत. यामुळे एकाच खर्चात व एकाच वेळेत या निवडणुका घेतल्या तर सरकार व प्रशासनावरील ताणही थोडा कमी होईल. शिवाय आचार संहितेचाही प्रश्न असल्याने याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
पणजी मनपा 28 फेब्रुवारी रोजी?
पालिका संचालनालयातून प्राप्त माहितीनुसार पणजी महापालिकेची मुदत 16 मार्च 2021 रोजी संपुष्टात येत असल्याने 28 फेब्रुवारी रोजी निवडणुका घेण्याचा प्रस्ताव गोवा सरकारने राज्य निवडणुक आयोगाला पाठविला आहे. राज्य निवडणुक आयोगाने यापूर्वीच सरकारला एक पत्र पाठवून पणजी मनपातील प्रभागांची पुनर्रचना करा. तसेच मुदतीच्या 15 दिवस अगोदर निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. गोवा सरकारने प्रस्तावाला मान्यता देऊन सध्या तरी 28 फेब्रु. ही तारीख निश्चित केली आहे. तोपर्यंत कोरोनाचा प्रभाव कमी झाला तर याच तारखेनुसार निवडणुका घेतल्या जातील.