ऑनलाईन टीम / मुंबई :
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात पॅकेजवरुन चांगलेच शाब्दिक वॉर सुरूच आहे.
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केले, त्यामध्ये कुठल्याही उपाययोजना नव्हत्या, कुठलेही निर्णय नव्हते, असे म्हणत महाराष्ट्र एकमेव राज्य आहे ज्या राज्याने कोरोना काळात लॉकडाऊन केल्यानंतर नागरिकांना मदत केलेली नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर फडणवीस यांनी वेगवेगळ्या देशांनी घोषित केलेल्या मदतीच्या पॅकेजबाबत ट्वीट करुन माहिती दिली होती. त्यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हे पॅकेज किंवा मदत ही तिथल्या केंद्र सरकारांनी केलेली आहे. आपले केंद्र सरकार काय देणार? अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही. बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून अशी टीका केली होती.
- आव्हाडांना विस्मरणाचा रोग : फडणवीस
त्यावर फडणवीस यांनी पलटवार करत म्हटले की, जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला आहे. याचे कारण महाराष्ट्रातील एकमेव सरकार आहे ज्यांनी कोणतीही मदत केलेली नाही. केंद्र सरकारने 20 लाख कोटींचे पॅकेज गेल्या वर्षभरात दिले आहे. देशातील इतर राज्यांनीही पॅकेज दिले आहे. फक्त महाराष्ट्राने एक पैशांचे पॅकेज तर दिलेच नाही पण त्याऐवजी लोकांचे वीज कनेक्शन कापणे, लोकांना त्रास देणे यावरच भर दिला आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
- विरोध कांगावा करण्यात हुशार : आव्हाड
याबाबत पलटवार करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तुम्ही सारखे 20 लाख कोटी दिले, असा दिंडोरा काय पिटता? यापैकी किती पैसे महाराष्ट्राला मिळाले, हे प्रथम भाजप नेत्यांनी सांगावे. त्यानंतर मला विस्मरणाचा रोग झाला, असे बोलावे. विरोधक हे केवळ कांगावा करण्यात हुशार आहेत, अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली.