सातारा / प्रतिनिधी :
शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेला शुक्रवारी सायंकाळी ईडीची नोटीस धडकली. ईडीने जप्त केलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्ज पुरवठा कशाच्या आधारे केला? याची तातडीने माहिती सादर करा, असे या नोटिसमध्ये म्हटले आहे. या नोटीसमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, नेमकी जिल्हा बँक कशाच्या बेसवर कर्ज पुरवठा करते, याचीच उलटसुलट चर्चा सुरु होती.
सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर पूर्णतः राष्ट्रवादी काँग्रेसचा ताबा आहे. जिल्हा बँकेचे चेअरमन जरी भाजपाचे आमदार असले तरीही बँकेवर सर्व होल्ड हा राष्ट्रवादीचाच आहे. शेतकऱ्यांच्या नावाचा वापर नेहमीच बँकेकडून केला जातो. वास्तविक बँकेचे अनेकदा वाभाडे बँकेचे संचालक आमदार जयकुमार गोरे यांनी बाहेर काढले होते. नुकतीच शुक्रवारी सायंकाळी बँकेच्या पत्रव्यवहार शाखेमध्ये ईडीकडून नोटीस पोहचली. त्या नोटीसचा शुक्रवारी सायंकाळपर्यंत कुठे गवगवा झाला नव्हता. मात्र, शनिवारी सकाळी बँकेला ईडीच्या आलेल्या नोटीसीची बातमी वाऱ्यासारखी पसरली. जरंडेश्वर कारखान्यावर ईडीने कारवाई केलेली आहे. कारखान्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांची चौकशी सुरु आहे. हा कारखाना ज्यांनी लिलावात घेतला त्यांना चार बँकांनी कर्ज पुरवठा केला होता. त्यात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेनेही 96 कोटींचे कर्ज दिल्याचे समोर आले आहे. हा कर्ज पुरवठा नेमका कसा केला? याची माहिती तातडीने ईडीने मागवली आहे. या नोटिसमुळे बँकेच्या प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.