प्रतिनिधी/ सातारा
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाबंदीची घोषणा केली आहे. त्या घोषणेची अंमलबजावणीसंदर्भात रविवारी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा-पुणे जिह्याच्या हद्दीवरील सारोळा चेकपोस्टला भेट देवून पाहणी केली व जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा, अशा सक्त सूचनाही त्यांनी पोलिसांना यावेळी केल्या.
संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर सातारा व सांगली जिह्यांच्या हद्दीवरील मालखेड येथील चेक नाक्याची परवा पहाणी केल्यानंतर सातारा व पुणे या दोन्ही जिह्यांचे हद्दीवरील सारोळा येथील चेक नाक्यावरील कायदा व सुव्यवस्थेची व कडक पोलीस बंदोबस्ताच्या अंमलबजावणीची त्यांनी पाहणी केली. यावेळी सातारा जिह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद आबा पाटील हे ही उपस्थित होते.
सारोळा चेकपोस्टवर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती या विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना दिली. त्यानंतर देसाईंनी पुणे जिह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना चेकनाक्यावरून फोन लावत पुणे हद्दीवरील चेक नाक्याचीही माहिती घेतली.
यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, राज्यात जिह्याच्या नाकाबंदीची पोलीस खात्याकडून योग्यप्रकारे अंमलबजावणी करण्यात येत आहे. परवा रात्री आठ वाजल्यापासून राज्यातील पोलीस दल अलर्ट आहे. संपुर्ण राज्यात जिल्हा वाहतुकीची बंदी लागू करण्यात असल्याने वैद्यकीय, दुःखद घटनेचे किंवा अत्यावश्यक कारणाशिवाय जिह्याची हद्द सोडता येणार नाही.
जनतेने सहकार्याची भूमिका ठेवावी
पोलिसांची नाकाबंदी चांगल्या पध्दतीने सुरु आहे. जनतेनेच आता प्रवास करणे टाळले पाहिजे. फारच गरज असेल तर परवानगी घेवून प्रवास करावा. पोलीस दलाचे अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उभे आहेत. जनतेनेही त्यांना सहकार्याची भूमिका ठेवावी पोलिसांच्या प्रकृतीची काळजी शासन घेत आहे जनतेनेही स्वतःची त्यांच्या कुटुंबाची व पोलिसांची काळजी घेतली पाहिजे, असेही आवाहन त्यांनी शेवटी बोलताना केले.