प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात कोरोनाचे संकट गडद होत असताना ‘सारी’ तापानेही धुमाकूळ घातला आहे. सारीचे रुग्ण तपासताना त्यात कोरोनाचीही लक्षणे आढळत असल्याने आरोग्य यंत्रणेचे तारांबळ उडत आहे. गेल्या तीन महिन्यांत सारीचे 49 रूग्ण आढळून आले असून 9 जणांच्या त्यामुळे मृत्यू झाला आहे. सारीचे निदान झालेल्या 11 जण कोरोना पॉझिटिव्हही आढळले आहेत.
सारीचा ताप हा समुहरोग असून त्यात अनेक आजारांचा समावेश आहे. कोरोना विषाणू व सारीचा थेट कोणताही संबंध नाही. मात्र या दोन्ही आजारांची प्रथमिक लक्षणे सारखीच असल्याचे दिसून येत असल्याचे तज्ञ वैद्यकीय अधिकाऱयांनी स्पष्ट केले. जिल्हा शासकीय रूग्णालयात तीन महिन्यांत उपचाराला आलेल्यापैकी 9 जणांचा सारी तापाने मृत्यू झाला.
जिल्हा रूग्णालयाने शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठविलेल्या अहवालात सारी तापाने 9 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर जिल्हा शासकीय रूग्णालयात ताप आलेले 61 जण दाखल झाले होते. त्यांची तपासणी केल्यानंतर त्यापैकी 49 जणांना सारीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सारी तापाच्या आजारात जंतूसंसर्ग होऊन फुफ्फुसातील दाब वाढून सूज येते. न्युमोनिया होऊन रक्तात ऑक्सीजनचे प्रमाण खालावते. त्यामुळे मेंदू, हृदय, किडनी निकामी होतात. शरीरात जंतूसंसर्ग झाल्याने आजाराचे निदान वेळेवर होत नाही. तापाचे जीवाणू, विषाणू रक्तात मिसळतात. रक्त तपासणीनंतरही आजाराचे निदान होत नाही. विषाणू अतिशय सुक्ष्म असल्याने तपासणीत दिसत नाही. माणसाचे हृदय काम करीत नसल्याने फुफ्फुसे बंद पडून हृदय, किडनीवर त्याचा विपरित परिणाम होतो. त्यामळे सर्व सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.