जान्हवी पाटील/ रत्नागिरी
गेल्या 8 महिन्यापासून संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातलेले असताना अन्य आजाराचे रूग्ण घाबरून वेळेत हॉस्पीटलला जात नव्हते. या सगळय़ांचा परिणाम अर्भक मृत्यू दरावर झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्याच्या कोविड काळात तब्बल 23 अर्भकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या कालावधीत जिल्हय़ाचा मृत्यूदर पावणेदोन टक्क्यांपेक्षा अधिक वाढून 4.80 पर्यंत पोहोचला आहे. गेल्या 5 वर्षातील हा उच्चांकी मृत्यूदर ठरला आहे.
कोरोनाच्या सुरूवातीचे पाच-सहा महिने अतिशय संभ्रमाचे व अस्थिरतेचे होते. पहिल्या चार महिन्यात अनेक नागरिक घराबाहेर पडायलाही घाबरत होते. बहुतांश खासगी रुग्णालयांचे दरवाजे या काळात बंद होते. शासकीय यंत्रणा कोविडच्या प्रतिबंधात गुंतली होती. यामध्ये कोविड वगळता अन्य रुग्णांची फरपट सुरु होती. काही डॉक्टर्सनी तर आपली कन्सल्टींगही बंद ठेवली होती. संसर्गाच्या भीतीने घरातच राहणे व वैद्यकीय सेवेमधील अस्थिरता यामुळे नागरिक घरच्या घरी काळजी घेणेच पसंत करीत होते. यामध्ये सर्वाधिक त्रास सहन करावा लागला ते गरोदर महिलांना. शासकीय रूग्णालयात गरोदर महिलांची नियमित तपासणी केली जात होती, मात्र कोरोनामुळे अनेक महिला वेळेत तपासणीला येणे टाळत होत्या. यामुळे योग्य आरोग्य सल्ल्यापासून त्या वंचित राहिल्या. योग्य ती काळजी घेतली न गेल्याने 1 किलोपेक्षा कमी वजनाची अर्भके जन्माला येण्याचे प्रमाण गेल्या 6 महिन्यात वाढले. जवळपास 54 अर्भके 1500 ग्रॅमपेक्षा कमी वजनांची होती.
जिल्हा शासकीय रूग्णालयात कोरोना काळात तब्बल 1 हजार 411 प्रसुत्या झाल्या. यामध्ये खासगी रूग्णालयातून 171 माता सिव्हीलमध्ये दाखल झाल्या होत्या. खासगी रूग्णालयांनी प्रसुतीचे रूग्ण दाखल करून घेण्यास दिलेला नकार, सिव्हीलमध्ये तज्ञांची व स्टाफ नर्सची कमतरता, निम्म्याहून अधिक स्टाफ कोविड रूग्णांसाठी काम करत असतानाही जिल्हा रुग्णालयाच्या प्रसुती विभागाचे हे योगदान महत्वाचे म्हणावे लागेल. कोविडशी अखंड लढा सुरु असतानाच 6 महिन्यात 1411 म्हणजेच रोज 7 ते 8 प्रसुत्या पार पडत होत्या. यामध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना 54 कमी वजनाच्या अर्भकांमध्ये 23 अर्भकांचा मृत्यू झाला. हे प्रमाण गेल्या काही वर्षांच्या प्रमाणापेक्षा खूपच अधिक आहे. या वर्षाचे 6 महिने अजूनही शिल्लक असल्याने त्याच वाढ होणार, हे स्पष्ट आहे. यामुळे आरोग्य विभागासमोर कोविडच्या जोडीनेच अर्भक मृत्यू रोखण्याचेही नवे आव्हान उभे राहिले आहे.