ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द करण्यात आली आहे. तसेच सोमवती यात्रेनिमित्त सोन्याच्या जेजुरीत कलम 144 नुसार, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे एरवी भंडाऱ्याच्या उधळणीने पिवळी झालेली सोन्याची जेजुरी यंदा मात्र शांत असणार आहे.
सोमवती यात्रेच्या दिवशी जेजुरी गडावरुन उत्सवमुर्ती पालखीतून कर्हा स्नानासाठी गडाच्या पायथ्याशी नेण्यात येतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे.
तसेच 13 ते 14 तारखेदरम्यान जेजुरीत येऊ नका, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
जेजुरीचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, 12 ते 14 डिसेंबरपर्यंत, म्हणजेच, शनिवार ते सोमवार तीन दिवसांसाठी भाविकांना जेजुरीत प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे या तीन दिवसात खंडोबा गडाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात येणार असून मंगळवार नंतर पुन्हा खंडोबा गडावर भाविक जाऊ शकतील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.