कोरोनाच्या संकटानंतर 2 वर्षांनी पडणार पगंती, सहजसेवा, मेहता ट्रस्ट व शिवाजी चौक मंडळाकडून स्वादिष्ट जेवणाची मेजवाणी, 5 लाख भाविक लाभ घेतील
संग्राम काटकर/कोल्हापूर
दोन वर्षांनी कोरोना संदर्भातील निर्बंध हटवत दख्खनचा राजा जोतिबाची 16 एप्रिल रोजीची चैत्रयात्रा पुर्वीसारखी डामडौलात साजरी केली जात असल्याने भाविक आनंदून गेले आहेत. यात्रेची शुभवार्ता कळातच दर्शनासाठी डोंगरावर जाणाऱया भाविकांना चार भरवणाऱया सहजसेवा ट्रस्ट, आर. के. मेहता चॅरिटेबल ट्रस्ट आणि छत्रपती शिवाजी चौक मित्र मंडळाने अन्नछत्र सुरु करण्याच्या हालचाली गतीमान केल्या. सध्या तर अन्नछत्रासाठी लागणारे तांदुळ, बेसन पीट, तेल, साखर, रवा, डाळ, चटणी, मसाले पदार्थ आदी साहित्य जमण्यासाठी जोरात धावपळ सुरु आहे. भाविकांसाठी स्वादिष्ट जेवण बनवण्याची कौशल्य असलेल्या आचाऱयांची टीमही ठरवली आहे. आता ही टीम जोतिबा डोंगरी दाखल होईल आणि त्यांनी बनवलेल्या जेवणाचा लाभ घेणाऱया भाविकांच्या पगंती पडू लागतील.
जोतिबाचे पाचही खेटे पूर्ण झाल्याने भाविकांना आता आस लागली आहे, ती म्हणजे जोतिबाच्या चैत्रयात्रेचे. 16 एप्रिल रोजी ही यात्रा होत आहे. त्यासाठी पाडळी निनाम (सातारा), विहे (ता. पाटण, जि. सातारा) आणि कसबे डीग्रज (मिरज) येथील मानाच्या सासनकाठय़ांसह विविध गावांमधील सासनकाटय़ा रणरणत्या उन्हाची तमा बाळगता चांगभलचा गजर आणि पारंपारिक वाद्यांच्या ठेक्यावर वाडीरत्नागिरीवर दाखल होतील. यात्रेचा दिवस जवळ आला की जा†तबाचे डोळे भरुन दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील भाविकांची पाऊले वाडीरत्नागिरीच्या दिशेने वळू लागतील आणि पाहता पाहता वाडीरत्नागिरी भाविकांनी हाऊसफुल्ल होईल. याचवेळी त्यांच्या पोटाला चार घास भरवण्यासाठी वाडीरत्नागिरी व पंचगंगा नदी घाटावर अन्नछत्राची चुल पेटेल. जसे जेवण केले तसे ते भरवून भाविकांना तृफ्त केले जाईल. भाविकही आपल्या हक्काचं जेवण म्हणून अन्नछत्राला गराडा घालतील यानंतर 3 दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत काही लाखांच्या घरात अन्नछत्राचा लाभ घेणाऱया भावकांच्या पगंती पडू लागतील.
आर. के. मेहता चॅरिटेबल ट्रस्ट
आर. के. मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नेहमीप्रमाणे एस. टी. स्टॅण्डनजिकच्या जागेत अन्नछत्राचे आयोजन केले जाईल. 15 ते 17 एप्रिल दरम्यान सुरु राहणाऱया अन्नछत्राचा सव्वा लाख भाविक लाभ घेतील, असे नियोजन केले आहे. यंदाचे अन्नछत्राचे 30 वे वर्ष आहे. या अन्नछत्रात ज्या भाविकांचा उपवास आहे, त्यांना उपवासाचे पदार्थ ही दिले जाणार आहे. या अन्नछत्राला यशस्वी करण्यासाठी ट्रस्टकडून 100 कार्यकर्ते तैनात असणार आहेत. शिवाय अन्नछत्रासाठी येणारा सर्व खर्च ट्रस्टकडूनच उचलला जाणार आहे.
आर. के. मेहता (अध्यक्ष : आर. के. मेहता चॅरिटेबल ट्रस्ट)
छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळ
गणेशोत्सवासाठी जमवलेल्या वर्गणीतून अनेक विधायक उपक्रम छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाकडून राबवले जातात. पंचगंगा नदी घाटावर जोतिबाच्या भाविकांसाठी अन्नछत्र हा त्यापैकीच एक उपक्रम आहे. 15 ते 17 एप्रिल या कालावधीत आयोजित केल्या जाणाऱया या अन्नछत्राचे यंदाचे 27 वर्षे आहे. किमान सव्वा लाख भाविक लाभ घेतली, इतके जेवणे केले जाणार आहे. अन्नछत्र यशस्वी करण्यासाठी 150 कार्यकर्त्यांचा राबता असणार आहे.
सहजसेवा ट्रस्ट
जोतिबा डोंगरावरील गायमुखाजवळच नेहमीप्रमाणे सहजसेवा ट्रस्टच्या वतीने अन्नछत्र आयोजित केले जात आहे. अन्नछत्राचे यंदाचे 22 वे वर्ष आहे. किमान अडीच लाख भाविक लाभ घेतील, असे नियोजन करुन 14 ते 17 एप्रिल या दरम्यान, अन्नछत्राचे आयोजन केले जाणार आहे. गेल्या दोन दशकांच्या परंपरेनुसार रक्तदान शिबिरासह आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन केले जात आहे. या संपूर्ण कार्यासाठी लोकवर्गणीची मदत लाभत आहे.
सन्मती मिरजे (विश्वस्त : सहजसेवा ट्रस्ट)