बेळगाव/प्रतिनिधी
टिळकवाडी कला मंदिरच्या जागेत व्यापारी संकुल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याकरिता कलामंदिर शेजारील भाजी मंडईचे शेड भुईसपाट करण्याची कारवाई मनपाच्या महसूल विभागाने बुधवारी सायंकाळी केली. अन्य 49 गाळेधारकांना गुरुवारी सकाळपर्यंत दुकाने रिकामी करण्याची सूचना करण्यात आली आहे. सदर कारवाई पूर्वसूचना किंवा नोटीस न देता करण्यात आल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले असून कारवाईबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत येथील जागेत बहुमजली व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता सदर जागेचे हस्तांतर मे महिन्यात करण्यात आले होते. त्यावेळी कला मंदिर आणि मनपा कर्मचाऱयांच्या क्वॉर्टर्सच्या इमारती हटविण्यात आल्या होत्या. काँग्रेस रोड रुंदीकरणातील नुकसानग्रस्तांना कला मंदिर शेजारील जागा मंजूर करण्यात आली होती. त्यामुळे नुकसानग्रस्तांनी त्या ठिकाणी दुकान गाळे बांधून व्यवसाय थाटला आहे. सदर गाळय़ांचा भाडे करार संपुष्टात आल्याने मुदतवाढ देण्याची मागणी मागील 20 वर्षांपासून गाळेधारकांनी केली होती. याकडे दुर्लक्ष करून या ठिकाणी बहुमजली व्यापारी संकुल उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे येथील नुकसानग्रस्तांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सदर नुकसानग्रस्तांना पर्यायी व्यवस्था केल्यानंतरच गाळे हटवावेत, असा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यामुळे याबाबतची माहिती तत्कालीन प्रशासक प्रादेशिक आयुक्त अमलान बिस्वास यांना नुकसानग्रस्तांनी दिली होती. त्यामुळे येथील 49 गाळे वगळून उर्वरित जागा हस्तांतर करण्याचा ठराव करण्यात आला होता. या ठरावाकडे दुर्लक्ष करून पूर्वसूचना न देताच येथील भाजी मंडईचे शेड हटविण्याची कारवाई महसूल विभागाने बुधवारी सायंकाळी केली.
सकाळी 9 पर्यंत गाळे रिकामी करा, अन्यथा जेसीबी फिरवू!
महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर यांच्या नेतृत्वाखाली सदर कारवाई करण्यात आली. याप्रसंगी व्यावसायिकांनी कारवाईला आक्षेप घेऊन गाळे पाडू नका, प्रथम पर्यायी व्यवस्था करा, अशी मागणी केली. पण व्यावसायिकांचा विरोध झुगारून कारवाई करण्यात आली. यावेळी 49 पैकी 20 गाळे भुईसपाट करण्यात आले. उर्वरित 29 गाळय़ांपैकी 2 गाळेधारकांनी न्यायालयाकडून स्थगिती घेतली आहे. त्यामुळे 27 गाळेधारकांना गाळे रिकामी करण्याची सूचना मनपाच्या अधिकाऱयांनी केली आहे. गुरुवारी सकाळी 9 पर्यंत गाळे रिकामी करा, अन्यथा जेसीबी फिरवू, असा इशारा मनपाच्या अधिकाऱयांनी दिला आहे.
महापालिकेच्या कारवाईचा निषेध
पूर्वसूचना व कोणतीही नोटीस न बजावता केलेल्या कारवाईबद्दल व्यापाऱयांनी नाराजी व्यक्त केली. गाळय़ांच्या भाडे कराराची मुदत वाढविण्याची सूचना करूनही मनपाने याकडे कानाडोळा केला. ऐनवेळी जेसीबी चालवून गाळे हटविण्याची कारवाई हाती घेतली आहे. यामुळे या ठिकाणी व्यवसाय करणाऱया व्यावसायिकांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या कारवाईचा निषेध करण्यात येत आहे.
या कारवाईत मनपाचे महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर, शहर अभियंते व्ही. एम. हिरेमठ, साहाय्यक कार्यकारी अभियंते, महसूल निरीक्षक व मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.