राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचे प्रतिपादन : आरसीयूचा 9 वा पदवीदान समारंभ उत्साहात, विविध मान्यवरांची उपस्थिती
प्रतिनिधी /बेळगाव
सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे आहे. दिवसागणिक येथे तंत्रज्ञानात बदल होत आहेत. त्यामुळे आताच्या विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान अवगत करून तशा पद्धतीने अभ्यास करावा. विद्यार्थी हा आजन्म विद्यार्थीदशेत राहिल्यास तो नवनवीन गोष्टी शिकत जातो. शिक्षणामुळे केवळ त्या विद्यार्थ्याचेच ज्ञान वाढते, असे नाही तर त्याच्यासोबत त्याचे गाव, त्याचे राज्य व देशाचाही विकास होतो. एक स्वावलंबी पिढी घडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून प्रत्येकाने ज्ञान वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले.
राणी चन्नम्मा विद्यापीठाचा 9 वा पदवीदान समारंभ बुधवारी सुवर्णविधानसौध येथे पार पडला. या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरु प्रा. एम. रामचंद्रगौडा, नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग ऍण्ड बायोटेक्नॉलॉजीचे चेअरमन प्रा. व्ही. एस. चौहान, वादिराज देशपांडे, पद्मश्री एच. सुदर्शन बल्लाळ, मूल्यमापन विभागाचे रजिस्ट्रार प्रा. वीरनगौडा पाटील, रजिस्ट्रार बसवराज पद्मशाली, फायनान्स ऑफिसर प्रा. डी. एन. पाटील यांसह प्रत्येक विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी प्रा. व्ही. एस. चव्हाण म्हणाले, पदवीदान समारंभ हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. शिक्षण हे वैयक्तिक आयुष्यासोबत समाज व राष्ट्रनिर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. सध्या देशभरात 3.7 कोटींहून अधिक विद्यार्थी उच्चशिक्षण घेत आहेत. विद्यापीठ हे केवळ एक प्रमाणपत्र देण्याचे केंद्र नसून तेथील विद्यार्थी नवीन कौशल्ये, ज्ञान प्राप्त करत असतो. पुढे येणारा काळ हा माहिती तंत्रज्ञानाचा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यासाठी कार्यरत राहणे गरजेचे आहे. आजचे युवक हे उद्याचा देश घडविणारे नागरिक असल्याने शिक्षणाचा पाया मजबूत असणे आवश्यक आहे, असे विचार त्यांनी मांडले.
कुलगुरु एम. रामचंद्रगौडा म्हणाले, विद्यापीठाने कमी कालावधीत सर्व क्षेत्रात नावलौकिक केला आहे. हिरेबागेवाडी येथे 127 एकर जागेत नवीन कॅम्पसचे काम प्रगतिपथावर आहे. विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली आहे. यावषी 86 डॉक्टरेट, 2 हजार 739 पदव्युत्तर, 35 हजार 484 पदवी तर 188 डिप्लोमाधारकांना पदवी देण्यात येणार आहे. विद्यापीठाने अनेक नामवंत संस्थांशी समन्वय करार केले आहेत. शिक्षणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही विद्यापीठ काम करत आहे. सरकारी शाळांमध्ये चांगल्या सुविधा पोहोचविण्यासाठी 10 लाखांचा निधी राखीव ठेवला आहे. भुतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयातील सिंह दत्तक घेण्यात आले आहेत. यासह ग्रामीण भागात रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, नेत्रतपासणी अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
राज्यपालांच्या हस्ते तीन व्यक्तींना यावषी मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरविण्यात आले. वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे पद्मश्री एच. सुदर्शन बल्लाळ, साहित्यिक क्षेत्रातील वादीराज देशपांडे यांना डॉक्टरेट देऊन गौरविण्यात आले. याचबरोबर पद्मश्री राजू तारनाथ अनुपस्थित राहिल्याने त्यांना त्यांच्या घरी जाऊन डॉक्टरेट दिली जाणार आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना राज्यपाल व मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. बेळगावसह विजापूर व बागलकोट जिल्हय़ांतील विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.
नंदिहळ्ळीच्या मुलीला सुवर्ण
नंदिहळ्ळी येथील विद्यार्थिनी प्रियांका कोलकार हिने पॉलिटीकल सायन्स विषयात सुवर्णपदक मिळविले. राज्यपालांच्या हस्ते सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन तिचा गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने सुवर्णपदकाला गवसणी घातल्याने कौतुक होत आहे. एपीएमसीचे माजी सदस्य परशुराम कोलकार यांची ती मुलगी आहे.
वृत्तपत्र विक्रेत्याचा मुलीला सुवर्ण
‘तरुण भारत’ वृत्तपत्र विक्रेत्याचा राजू गुळण्णावर यांच्या मुलीने समाजशास्त्र विषयात एमएला सुवर्णपदक मिळविले आहे. राजू गुळण्णावर हे अनगोळ व टिळकवाडी परिसरात वृत्तपत्र विक्री करतात. श्वेता सध्या आरसीयूमधून पीएचडीचा अभ्यास करत आहे. उच्चशिक्षण घेऊन आपल्या आई-वडिलांचे नाव उंचावण्याचा तिचा मनोदय आहे.
शेतकऱयाच्या मुलीची सुवर्णपदकाला गवसणी
चंदगड-अष्टे येथील मेघा कृष्णा निलजकर या विद्यार्थिनीने क्रिमिनॉलॉजी ऍण्ड क्रिमिनल जस्टीस या विषयात एमएला सुवर्णपदक मिळविले आहे. मेघाचे वडील शेतकरी असून त्यांनी मेहनतीतून मेघाचे शिक्षण पूर्ण केले. मेघा सध्या पोलीस विभागात सोशॉलॉजीची प्राध्यापिक म्हणून सेवा बजावत आहे. यापूर्वी तिने दोनवेळा युपीएससी क्लिअर केली असून मुलाखतीत संधी हुकली. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीही उच्चशिक्षण घेऊ शकतात, हे तिने दाखवून दिले आहे.
मराठी माध्यमाच्या कविताला इंग्रजीमध्ये सुवर्ण
मराठी माध्यमात शिकलेले विद्यार्थी इंग्रजीमध्ये आपले वेगळे अस्तित्व निर्माण करू शकतात, हे जाफरवाडी येथील कविता वैजू गौंडाडकर हिने दाखवून दिले आहे. कविताचे शिक्षण जाफरवाडी-कडोली, त्यानंतर भाऊराव काकतकर महाविद्यालयात झाले. लहानपणापासून इंग्रजी विषयात आवड असल्याने तिने पदवीनंतर स्पेशलायझेशन करून सुवर्णपदकाची कमाई केली. शिक्षण घेताना कोणत्या माध्यमात शिकलो याचा न्यूनगंड विद्यार्थ्यांनी बाळगू नये, असे ती म्हणते.
कोल्हापूरच्या मुलाला आरसीयूमध्ये सुवर्ण
कोल्हापूर येथील सोहम चिपळूणकर या विद्यार्थ्याने क्रिमिनॉलॉजी ऍण्ड क्रिमिनल जस्टीस या विषयामध्ये पदवीला सुवर्णपदक मिळविले. आपल्याला या विषयात आवड असल्यामुळे आपण बेळगाव येथे येऊन या विषयाचा अभ्यास केला. या विषयात पुढे अजून भविष्य घडवायचे असल्याचे सोहमने तरुण भारतशी बोलताना सांगितले.