विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरून घेण्याची प्रक्रियाही अद्याप सुरू झालेली नाही.
वार्ताहर / पाटगांव
एक सत्र संपल्यानंतरही शाळा सुरू न झाल्यामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबतही पेच निर्माण झाला आहे. दरवर्षीच्या नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा न घेता त्या पुढे ढकलता येतील का, याबाबत राज्य मंडळाची चाचपणी सुरू आहे.
दरवर्षीच्या नियोजित शैक्षणिक वेळापत्रकानुसार पहिल्या सत्राचा कालावधी संपत आला आहे. मात्र, अद्यापही प्रत्यक्ष शाळा सुरू झालेल्या नाहीत. ऑनलाइन वर्ग सुरू असले तरी त्यालाही मर्यादा आहेत. दरवर्षीच्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे आयोजन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ (राज्यमंडळ) करते. या परीक्षांचे वेळापत्रक सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात जाहीर केले जाते. मात्र, यंदा या परीक्षांबाबत पेच निर्माण झाला असून, विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरून घेण्याची प्रक्रियाही अद्याप सुरू झालेली नाही.
दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभाग विचार करत आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा डिसेंबरमध्ये शाळा सुरू होतील असे गृहीत धरले तरी त्यानंतर बारावीच्या परीक्षेसाठी अवघे दोन महिने, तर दहावीच्या परीक्षेसाठी तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. राज्य मंडळाने सध्या अभ्यासक्रमातील २५ टक्के भारांश कमी केला आहे. मात्र, उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रमाची तयारी दोन किंवा तीन महिन्यांत कशी करून घेणार, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
त्याचप्रमाणे शाळा सुरू झाल्याशिवाय विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरून घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे अर्ज घेणे आणि पुढील प्रक्रियेसाठीही कालावधी आवश्यक आहे. यंदा बारावीचा अभ्यासक्रम आणि प्रश्नत्रिकेचे स्वरूपही बदलले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी- मार्च महिन्यात परीक्षा घ्याव्यात का, असा पेच राज्य मंडळासमोर आहे.
शिक्षकांची मते..
विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेऐवजी प्रकल्प देण्यात यावेत, परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, एकूण गुण कमी करावेत, सध्या राज्यमंडळाने अभ्यासक्रमाचा भारांश २५ टक्के कमी केला आहे तो आणखी कमी करावा, परीक्षा केंद्र शाळेतच असावे अशी मते शिक्षक, तज्ज्ञ, माजी अधिकारी यांनी व्यक्त केली. शिक्षण विकास मंच या गटातर्फे दहावी-बारावी या परीक्षांबाबत चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे वय, साधनांची उपलब्धता हे मुद्दे लक्षात घेता परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन घेण्यात येऊ नये असा सूर या चर्चेत होता. परीक्षा पद्धतीत बदल करण्यात येऊ नये. मात्र, परीक्षा पुढे ढकलण्यात यावी असे मत बहुतेक शिक्षकांनी व्यक्त केले. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षेचे पर्याय द्यावेत, असाही पर्याय सुचवण्यात आला.
पुढे ढकलण्याचा पर्याय?
नियोजित वेळापत्रकानुसार फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये परीक्षा न घेता त्या काही महिने पुढे ढकलण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडे येत असल्याची माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार राज्य मंडळही परीक्षा पुढे ढकलता येतील का, याची चाचपणी करत आहे.
यंदा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षाही जुलै किंवा ऑक्टोबरमध्ये झालेली नाही. या विद्यार्थ्यांचाही प्रश्न आहे. फेरपरीक्षा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये आणि नियमित परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्याच्या पर्यायाचीही सध्या चर्चा सुरू आहे. परीक्षांचे नियोजन करताना सद्य:स्थिती, पुढील वर्षांच्या वेळापत्रकावर होणारा परिणाम, सण, उत्सव, पाऊस अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्या सगळ्याचा आढावा घेऊन काय उपाय करता येईल याबाबत विचार करण्यात येत आहे, असे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.