भारत-इंग्लंड मालिकेने नव्या कसोटी चॅम्पियनशिपला सुरुवात
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने बुधवारी दुसऱया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी गुण देण्याच्या पद्धतीत बदल केला असल्याचे जाहीर केले असून यापुढे विजय मिळविणाऱया संघास 12, अनिर्णीत सामन्यास 6 आणि टायसाठी 4 गुण देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. दुसरी कसोटी चॅम्पियनशिप भारत व इंग्लंड यांच्यातील पाच कसोटींच्या मालिकेने ऑगस्टमध्ये सुरू होत आहे.
2021-2023 असे या चॅम्पियनशिपचा कालावधी असेल. क्रमवारी निश्चित करण्यासाठी संघांनी मिळविलेल्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याआधी प्रत्येक मालिकेला 120 गुण देण्यात येत होते. यामुळे गुणांमध्ये असमानता निर्माण झाल्याचे दिसून आले. दोन कसोटींच्या मालिकेसाठी 120 गुण देण्यात येत असल्याने प्रत्येक कसोटीत विजयी संघास 60 गुण आणि पाच कसोटींच्या मालिकेसाठीही 120 गुण असल्याने विजयी संघास केवळ 24 गुण मिळत असत. आता नव्या गुण पद्धतीत ही असमानता राहणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. याशिवाय गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे काही मालिका होऊ शकल्या नव्हत्या, त्यावेळी गुण देण्यात अडचण निर्माण झाली होती. त्यातून बोध घेत हा नवा बदल करण्यात आल्याचे आयसीसीचे प्रमुख कार्यकारी जेफ ऍलर्डाईस यांनी सांगितले.
‘आधीच्या गुण पद्धतीचा अभ्यास केल्यानंतर त्यात सोपेपणा आणणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन नवी प्रमाणित गुण पद्धत सुरू करण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये प्रत्येक सामन्याच्या निकालाचा संघांचे मानांकन ठरविण्यास उपयोग होईल, याची दक्षता घेतली गेली आहे. महामारीमुळे काही मालिका होऊ शकल्या नव्हत्या. त्यावेळी प्रत्येक संघाने मिळविलेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे त्या संघांना गुण देण्यात आले होते. या निर्णयामुळेच आम्हाला अंतिम संघ निश्चित करण्यात आणि चॅम्पियनशिप पूर्ण करण्यात यश आले होते,’ असेही त्यांनी सांगितले.
दुसऱया कसोटी चॅम्पियनशिप चक्रामध्ये भारत-इंग्लंड आणि त्यानंतर इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिका या केवळ दोनच मालिका पाच सामन्यांच्या असतील. याशिवाय पुढील वर्षी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी मालिका ही चार कसोटींची एकमेव मालिका असेल. या चॅम्पियनशिपचे चक्र जून 2023 मध्ये पूर्ण होणार आहे. 9 संघांत मिळून एकूण सहा मालिका होणार असून त्यातील तीन मायदेशात व तीन प्रतिस्पर्ध्यांच्या देशात खेळविण्यात येतील. आधीच्या चक्रातही हीच पद्धत ठेवण्यात आली होती. न्यूझीलंड हे पहिल्या कसोटी चॅम्पियनशिपचे विजेते असून गेल्या महिन्यात त्यांनी अंतिम लढतीत भारताचा पराभव करून जेतेपद मिळविले आहे.