ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात सोमवारी ओमिक्रॉनच्या 19 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशात आढळलेल्या ओमिक्रॉन रुग्णांची संख्या आता 174 वर पोहचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे यामधील 42 रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक आहे.
सोमवारी दिल्लीत ओमिक्रॉनच्या आठ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर कर्नाटकात पाच, केरळमध्ये चार, राजस्थान आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची पुष्टी झाली आहे. देशातील 13 राज्यात ओमिक्रॉनने हातपाय पसरायला सुरुवात केली असून, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. दरम्यान, भारतात आतापर्यंत ओमिक्रॉनचे जे रुग्ण आढळले आहेत, त्यामधील एकाही रुग्णामध्ये गंभीर लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
महाराष्ट्रात 31 रुग्णांची ओमिक्रॉनवर मात
महाराष्ट्रात आतापर्यंत ओमिक्रॉनची 54 प्रकरणे आढळून आली आहेत. त्यामधील 31 रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 23 आहे.