प्रतिनिधी / उस्मानाबाद
मागील बारा वर्षांपासून सतीश चव्हाण औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या पदवीधर निवडणुकीत सतीश चव्हाण यांना पुन्हा काम करण्याची संधी द्या असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.यावेळी त्यांनी जे दोन दिवस सरकार टिकवू शकले नाहीत, ते दोन महिन्यात सरकार पाडण्याची भाषा करीत आहेत. राज्यातील जनतेचा विश्वास आणि तिन्ही पक्षांतील समन्वयामुळे हे सरकार पुढील दोन महिने नव्हे, दोनशे महिने सरकार पडणार नाही असा ही टोला लगावला.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ गुरूवारी उस्मानाबाद शहरातील शुभमंगल कार्यालयात आयोजित पदवीधर व कार्यकर्ता जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, महापरीक्षा पोर्टल बंद करणे, नीटचे परीक्षा केंद्र सुरू करणे, वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशाचा 70:30 चा फॉर्म्यूला रद्द करणे असो, विनाअनुदानित शाळांचे प्रश्न असो, शिक्षक, प्राध्यापक व पदवीधरांचे प्रश्न आमदार सतीश चव्हाण यांनी सभागृहात मांडून आपली कामगिरी दाखवून दिली. त्यामुळे त्यांना मराठवाड्यातील पदवीधर मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून मोठ्या मताधिक्याने ते विजयी होणार असल्याचा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. टाळी, थाळी वाजवून, दिवे लावून देशातील कोरोना जाण्याऐवजी उलट वाढला. देशाच्या पंतप्रधानांचा निर्णय म्हणून आपण जे जे केले, त्याने कोरोनावर नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आणि राज्य सरकारचा निषेध करणार्या भाजपाने कोरोनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला.
पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे सरकार संयमाने निर्णय घेवून कोरोनावर नियंत्रण मिळवित आहे. मात्र सर्वसामान्यांची काळजी नसणारे विरोधक मंदिरे उघडा, शाळा उघडून गर्दी वाढवून कोरोना वाढविण्यावर भर देत आहेत. मात्र राज्य सरकार याकडे फारसे लक्ष न देता उपाययोजना करून सामान्यांना दिलासा देण्याचे काम करीत आहे.
दोनशे महिने सरकार पडणार नाही
जे दोन दिवस सरकार टिकवू शकले नाहीत, ते दोन महिन्यात सरकार पाडण्याची भाषा करीत आहेत. राज्यातील जनतेचा विश्वास आणि तिन्ही पक्षांतील समन्वयामुळे हे सरकार पुढील दोन महिने नव्हे, दोनशे महिने सरकार पडणार नाही. पाच वर्षे ज्यांनी आंब्याच्या झाडाखाली बसून आंबे खाल्ले, त्यांच्यावर आज बाभळीच्या झाडाखाली बसण्याची वेळ आली आहे, असा टोला ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपाला लगावला.
चव्हाणांना मोठे मताधिक्य मिळेल
मराठवाड्यातील पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मागील दोन कार्यकाळ आमदार सतीश चव्हाण यांनी अनेक परिश्रम घेतले आहेत. याची जाण मराठवाड्यातील पदवीधरांना आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळत असून सतीश चव्हाण मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. तुळजापूर आणि उमरगा तालुक्यातून 80 ते 90 टक्के मतदारांचा कौल चव्हाणांना असेल, अशी ग्वाही माजीमंत्री मधुकर चव्हाण यांनी यावेळी दिली.