नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने देशात वेग घेतल्यानंतर दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच आता भारतातील कोरोना प्रतिबंधक लसींच्या परिणामकारकतेसंदर्भात सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यास मृत्यूचा धोका 95 टक्क्मयांपर्यंत कमी होतो, असे ‘आयसीएमआर’च्या (भारतीय संशोधन अनुसंधान संस्था) एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
तामिळनाडूच्या पोलीस दलातील 1 लाख 17 हजार 524 जवानांच्या आधारे करण्यात आलेल्या परीक्षणाअंती ‘आयसीएमआर’ने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अभ्यासादरम्यान लस घेतलेले जवान आणि लस न घेतलेले जवान यांच्यापैकी किती जणांचा कोरोनाने मृत्यू झाला याबद्दल निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. हा अभ्यास 1 फेब्रुवारी 2021 ते 14 मे 2021 या कालावधीत करण्यात आला. या अभ्यासासाठी लसीचा एक डोस घेतलेले 32 हजार 792 कर्मचारी निवडण्यात आले. लसींचे दोन्ही डोस घेतलेले 67 हजार 673 कर्मचारी होते, तर 17 हजार 059 पोलीस कर्मचाऱयांनी लस घेतली नव्हती. या अभ्यासानुसार, 13 एप्रिल 2021 ते 14 मे 2021 या दरम्यान 31 पोलीस कर्मचाऱयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यापैकी 4 जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते, तर 7 जणांनी एकच डोस घेतला होता. बाकीच्या 20 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नव्हती, असे दिसून आले होते.
सध्याच्या कोरोना प्रतिबंधक लस या मृत्यूसंख्या रोखण्यासाठी प्रभावी ठरत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस ज्या पोलीस कर्मचाऱयांनी घेतला होता, त्यांना मृत्यूचा धोका 82 टक्क्मयांपर्यंत कमी होता, तर दोन्ही डोस घेतलेल्यांना हा धोका 95 टक्क्मयांपर्यंत कमी असल्याचे आढळून आले. तसेच ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्या तुलनेत लस घेतलेल्या लोकांना मृत्यूचा धोका फारच कमी आहे. पहिला डोस घेतलेल्यांना मृत्यूचा धोका 0.18 टक्के होता तर दोन्ही डोस घेतलेल्यांना हा धोका 0.05 टक्के होता, असे निरीक्षणही नोंदवण्यात आले आहे. या अभ्यासामुळे लस लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे.