प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या धास्तीमुळे गावाकडे जाण्यासाठी परप्रांतीयांची धडपड सुरूच आहे. ना….शासनाची परवानगी, ना…. आरोग्य तपासणी, थेट ट्रकच्या ट्रेलरमधून खचाखच भरून 100 नागरिक राजस्थानला चालले होते. मात्र, बागेवाडी चेकपोस्टवर सदर वाहन अडवून त्यांना सीपीएड ग्राऊंड येथे आणण्यात आले. आरोग्य तपासणी करून त्यांना समाज कल्याण खात्याच्या वसतिगृहात ठेवण्यात आले.
शासनाकडून परवानगी घेतल्यानंतर परराज्यात जाण्याची मुभा देण्यात आली आहे. याकरिता शासनाने परप्रांतीयांचे अर्ज भरून घेतले आहेत. मात्र, शासनाकडून कोणतीच परवानगी न घेता बेंगळूरहून निघालेल्या 100 नागरिकांना मंगळवारी बागेवाडीजवळ ताब्यात घेण्यात आले. सदर नागरिक बेंगळूर शहरामधून राष्ट्रीय महामार्गावर दाखल झाले. त्या ठिकाणी एका ट्रक टेलरमध्ये बसून राजस्थानला जाण्यासाठी निघाले. या ट्रकमध्ये साहित्य आणि नागरिकांमुळे गर्दी झाली होती. या गर्दीतूनच ते गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. त्यांनी राजस्थानला जाण्यासाठी शासनाकडून कोणतीच परवानगी घेतली नव्हती. आरोग्य तपासणीही केली नाही. सोमवारी रात्री 9.30 वा. 100 नागरिकांना घेऊन निघालेला ट्रक टेलर मंगळवारी सकाळी 9 वा. बागेवाडी चेकपोस्टजवळ आला. त्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना ट्रक टेलरबाबत संशय आला. त्यामुळे पोलिसांनी तो ट्रक अडवून चौकशी केली असता त्यामध्ये लहान मुलांसह 100 जण असल्याचे आढळून आले. याबाबत कोविड-19 सेंटरला माहिती देऊन सदर ट्रक व नागरिकांना ताब्यात घेऊन सीपीएड ग्राऊंडवर आणण्यात आले. यावेळी सदर ट्रक चालकाकडे व वाहनामध्ये असलेल्या नागरिकांकडे चौकशी केली असता विनापरवाना राजस्थानकडे निघाल्याची माहिती उपलब्ध झाली. सदर पोलीस प्रशासनाच्या काऊंटरवर नागरिकांची नावे नोंद करून घेण्यात आली. त्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करून समाज कल्याण खात्याच्या वसतिगृहात ठेवण्यात आले. आरोग्य तपासणी करत असताना एका तरुणाला 102 ताप असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्या तरुणाला बाजूला बसविण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील तज्ञ वैद्यकीय अधिकाऱयांना पाचारण करून त्या तरुणाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी सदर तरुणाचा ताप कमी झाल्याचे निदर्शनास आले.
लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात 350 नागरिक ट्रकमधून राजस्थान, बिहार, मध्यप्रदेश अशा विविध राज्यात जाण्यास निघाले होते. त्यांना बंदिस्त ठेऊन संबंधित राज्यांच्या जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनंतर पाठविण्यात आले. त्याच प्रमाणे या 100 नागरिकांनाही समाज कल्याण खात्याच्या वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. या राजस्थानी नागरिकांना पाठविण्याच्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने राजस्थान राज्याच्या प्रशासनाशी संपर्क साधला आहे. राजस्थान शासनाच्या परवानगीनंतर पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.