कोरोनाने पुन्हा डोकेवर काढल्याने प्रशासन पुन्हा हादरले : मास्कबाबत नागरिक पूर्णतः उदासीन
मनीषा सुभेदार / बेळगाव
ना बसचालक ना रिक्षाचालक, ना पालक ना बालक, ना शिक्षक ना विद्यार्थी आणि नागरिकसुद्धा…. कोरोना नाही त्यामुळे मास्क घालण्याची गरज नाही, अशीच मानसिकता या घटकांमध्ये दिसून येत आहे. वास्तविक नियंत्रणात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोकेवर काढल्याने प्रशासनसुद्धा पुन्हा हादरले असून प्रशासनाने नवीन नियमावली पुन्हा लागू केली.
सार्वजनिकरित्या सण-उत्सव साजरे करण्यावर सरकारने निर्बंध घातले आहेत. अर्थातच होळी, रंगपंचमी, गुढीपाडवा, गुडफ्रायडे, शब-ए-बारात यासह अन्य सण साजरे करण्यास मर्यादा येणार आहेत. सण-उत्सव सार्वजनिकरित्या एकत्र येण्यासाठी आवश्यक आहेतच. परंतु सध्या विचार करावा लागणार आहे तो आरोग्याचा. मात्र त्याबाबतीतच बेळगावकर उदासीन दिसत आहेत.
मास्क परिधान करणारे बसचालक आणि वाहक हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत. चालक तर मास्क परिधान करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्या बरोबरीनेच बसमधील बहुसंख्य प्रवासी प्रामुख्याने तरुणाई मास्क वापरत नाहीत. मास्क धारण केलेल्या सहप्रवाशाने त्यांना मास्कबाबत विनंती करताच उद्धट उत्तरे मिळतात व तुम्ही कोण आम्हाला सांगणारे? असा प्रश्न केला जातो.
सर्वात ज्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यायला हवी ते विद्यार्थी कोरोनाबाबत मुळीच गंभीर नाहीत. शाळा सुटल्यानंतर बससाठी थांबलेल्या विद्यार्थ्यांच्या गर्दीमध्ये कोणीही मास्क परिधान केलेले दिसत नाही. शाळा सुरू केल्या गेल्या तरी शाळा चालकांनी व संस्था चालकांनी कोविड-19 च्या नियमांचे पालन करावे असे सरकार आणि शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. परंतु या नियमाला विद्यार्थ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
कोणत्याही रिक्षा स्टॅण्डवर रिक्षाचालकांनी मास्क परिधान केला आहे, असे चित्र दिसत नाही. प्रवाशांसाठी तार स्वरात ओरडताना मास्कची अडचण होते, असे त्यांचे म्हणणे आहे. खुद्द बसचालक व रिक्षाचालक मास्क वापरत नसल्याने या वाहनांतून ये-जा करणाऱया प्रवाशांनासुद्धा ते नियमांचे पालन करण्यास सांगत नाहीत. नियमाला अपवाद असल्याप्रमाणे मास्क परिधान करणे आवश्यक आहे, याची जाणीव ज्यांना आहे असे मोजकेच लोक मास्क परिधान करताना दिसत आहेत.
पहाटे फिरायला जाणारे लोक मास्कबाबत उदासीन आहेत. बाजारात येणारे बहुसंख्य लोक मास्ककडे पूर्ण दुर्लक्ष करत आहेत. सामाजिक अंतराचा तर पूर्ण फज्जाच उडाला आहे. लॉकडाऊन नको, त्यामुळे आर्थिक बजेट कोलमडणार आहे, असे नागरिकच म्हणत आहेत आणि हेच नागरिक मास्कबाबत पूर्णतः उदासीन आहेत. कोरोना डोकेवर काढू लागला आहे. बाधितांची संख्या वाढत आहे. इतके भान बाळगून कोविड-19 च्या नियमांचे पालन करणे भाग आहे. गेले वर्षभर कोरोना बाधितांवर उपचार करून व कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य खाते, बिम्स आणि प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले. आता त्यांच्या कार्यक्षमतेची सहनशीलता संपुष्टात आली आहे. या आरोग्य सेवकांवर आपल्या बेपर्वाईने ताण येणार नाही, याची जबाबदारी सर्व नागरिकांचीच आहे. तुमच्यामुळे आमचे आरोग्य धोक्मयात आणू नका, असे प्रत्येकाने दुसऱयाला सांगून कोविड-19 च्या नियमांचे पालन करणे, ही काळाची गरज आहे.
नियमांची गांभीर्याने अंमलबजावणी केली जाईल
मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे यासह कोविड-19 च्या सर्व नियमावलींचे पालन करणे हे बंधनकारक आहे. एका व्यक्तीच्या दुर्लक्षामुळे किंवा नियम उल्लंघनामुळे दुसऱया व्यक्तीचे आरोग्य धोक्मयात आणण्याचा अधिकार आपल्याला नाही. सर्व खात्याच्या अधिकाऱयांना प्रामुख्याने परिवहन आणि आरटीओ अधिकाऱयांना आपण याबाबतीत सूचना देऊ आणि नियमांची गांभीर्याने अंमलबजावणी केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. हरिषकुमार यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
-जिल्हाधिकारी डॉ. हरिषकुमार
मास्कबाबत बसचालक-वाहकांचे दुर्लक्ष खेदजनक
मास्कबाबत बसचालक आणि वाहक यांचे दुर्लक्ष खेदजनक आहे. आम्ही त्यांना सांगण्याची वेळ येते हे दुर्दैव आहे. शुक्रवारी सकाळी आपण स्वतः बसस्थानकाच्या आवारात थांबून वाहक आणि चालकांना मास्क घालण्याची सक्ती केली आहे. याबाबत आपण पुन्हा जागृती करू व प्रत्येक वाहक आणि चालक मास्क परिधान करूनच सेवा बजावेल, याकडे लक्ष देऊ.
– के. के. लमाणी विभागीय नियंत्रणाधिकारी-केएसआरटीसी
तक्रार आल्यास कडक कारवाई करणार
मास्क परिधान करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. वास्तविक रिक्षा चालकांना याबाबत सांगण्याची वेळ येवू नये. तथापि सर्व रिक्षाचालक आणि वाहनचालकांनी मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. याबाबत एखाद्या प्रवाशाची तक्रार आल्यास कडक कारवाई केली जाईल.
शिवानंद मगदूम-आरटीओ