केंद्रीयमंत्री नित्यानंद राय यांचे प्रतिपादन, मानवतेच्या भूमिकेतून करण्यात आला
विशिष्ट धर्माच्या लोकांचे लांगुलचालन करण्यासाठी विरोधी पक्ष नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करीत आहेत. मात्र, त्यांची ही कृती मागासवर्गीयांच्या आणि दलितांच्या विरोधात आहे, अशी टीका केंद्रीयमंत्री नित्यानंद राय यांनी केली आहे. ते येथे शुक्रवारी पत्रकारांबरोबर संवाद करीत होते.
अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे धार्मिक अल्पसंख्याकांवर धर्माच्या नावाने अत्याचार होत आहेत. या अत्याचारांना कंटाळलेल्या अशा जनतेने भारतात आश्रय मागितला आहे. या अल्पसंख्य समाजाचा सन्मान आणि प्रति÷ा नव्या नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे सुनिश्चित होणार आहे. त्यामुळे हा कायदा मानवतेच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.
विरोध मतलबी
या कायद्याला होणारा विरोध राजकीय हेतूने होत असून त्याचा संबंध मतपेटीच्या राजकारणाशी आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान व बांगलादेश या देशांमधील हिंदू समाजात मोठय़ा प्रमाणावर मागासवर्गीय आणि दलितांचा समावेश आहे. त्यांच्यावरही तेथे ते हिंदू असल्याने धार्मिक अत्याचार व अन्याय होत आहेत. अशा नागरिकांना भारतात आश्रय आणि नागरिकत्व देण्याला विरोध करणारे विरोधी पक्ष हे दलित आणि मागासवर्गीयांच्याही हिताच्या विरोधात आहेत, अशी टीका नित्यानंद राय यांनी बोलताना केली.
मोदींची धोरणे हिताची
पंतप्रधान मोदी यांची धोरणे मागासवर्गीय आणि दलितांच्या हिताची आहेत. मोदीनींच पुढाकार घेऊन केंद्रीय विद्यालयांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आरक्षण देऊ केले आहे. मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केले. नागरिकत्व सुधारणा कायद्यासारखा मानवतावाद बळकट करणारा कायदा केला. विंग कमांडर अभिनंदनला सोडण्यास पाकिस्तानला भाग पाडले. अशा अनेक कृती त्यांनी देशाच्या हितासाठी केल्या. त्यांच्यावर टीका करणे देशहिताच्या दृष्टीने योग्य नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.