ममता बॅनर्जी यांचे विधान – निवडणूक आयोग अन् भाजपवर बरसल्या
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. निवडणुकीनंतर सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाला निष्पक्ष स्वरुप प्रदान करण्यासाठी धाव घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
आयोगाच्या अधिकाऱयांचे अनेक कथित व्हॉट्सऍप चॅट दाखवून ममतांनी आयोग पूर्णपणे भाजपच्या इशाऱयानुसार काम करत असल्याचा आरोप केला आहे. भाजपच्या सुचनेनुसारच बंगालमध्ये 8 टप्प्यांमध्ये निवडणूक घेतली गेली आणि याचमुळे बंगालसह देशभरात कोरोनाचा कहर वाढला असल्याचा दावा ममतांनी केला आहे.
तीन टप्प्यांत निवडणूक का नाही?
कोरोनाची दुसरी लाट येत असल्याचे इनपूट भाजप आणि निवडणूक आयोगाला मिळाले होते. मग बंगालमध्ये निवडणूक तीन टप्प्यांमध्ये का घेण्यात आली नाही? शेकडो लोक बाहेरून आणले गेले. निमलष्करी दलाच्या 2 लाख जवानांची कोविड चाचणी न करता त्यांना बंदोबस्तासाठी एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी हलविण्यात येत असल्याचे ममता म्हणाल्या. निवडणूक आयोगाने पूर्णपणे भाजपचय सांगण्यानुसार काम केले आणि यापूर्वीच्या निवडणुकीतही भाजपच्या इशाऱयानुसारच आयोग वागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
भाजपला 100 हून कमी जागा
हा क्हॉट्सऍप चॅट एका प्रसारमाध्यमाकडून मिळाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजपला 70 हून अधिक जागा मिळणार नाहीत. काँग्रेस-माकपला 20-25 जागा मिळू शकतील. कूचबिहारमध्ये जाणूनबुजून गोळीबार करण्यात आला. यासंबंधी सर्व पुरावे मिळाले असून आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. या निवडणुकीनंतर निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेसाठी दाद मागणार आहे. हे प्रकरण घटनापीठासमोर मांडले जावे. भाजपकडून निवृत्त अधिकाऱयांचा वापर करण्यात येत असल्याचे ममतांनी म्हटले आहे.
मोदींनी राजीनामा द्यावा
आम्ही सर्वांना मोफत लस देणार आहोत. केंद्र सरकार आम्हाला ऑक्सिजन आणि औषधे पुरवत नाही. देशातील कोरोनाची स्थिती आता नियंत्रणाबाहेर गेली आहे. देश आत्मनिर्भर होणार असल्याचे सांगितले जात असताना ऑक्सिजन, औषधे आणि लसींचा तुटवडा जाणवत आहे. आत्मनिर्भर भाजपने या देशाला संकटात लोटले आहे. बंगालवर कब्जा करण्यासाठी या लोकांनी पूर्ण देशाला धोक्यात आणले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ममतांनी केली आहे.