अध्याय दहावा
नाथमहाराजांनी वर्णन केलेला सद्गुरुरुपी वैद्यांचा महिमा आपण अभ्यासला. अवधुतांच्या चोवीस गुरुंची लक्षणे ऐकून उद्धवाची भावना ब्रह्ममय झाली होती. तो मनात म्हणाला, ब्रह्माने हे सर्व जग व्यापलेले आहे. माझ्या ठायीही ते अंतर्बाह्य व्यापून आहे. परंतु हे माझे मलाच अद्याप समजले नाही. ते कसे समजून घ्यावे काही कळत नाही. उद्धवाच्या मनातली चिंता भगवंतांना समजली आणि त्यावरचा उपाय सांगण्यास त्यांनी आरंभ केला. ते म्हणाले, पूर्वी वेद सांगताना वर्णाश्रमादि स्वधर्म मीच सांगितला. नारदपंचरात्रादि ग्रंथात वैष्णव धर्म हे माझ्या उपासनेचे गुह्य वर्मही सांगितले. ज्याचा जो वर्ण आणि जो आश्रम असेल त्याने त्या वर्णाश्रमधर्माप्रमाणे वागावे. दुसऱयाचा धर्म आचरिला असता मोठे दुःख भोगावे लागते. उद्धवा, कर्म करताना फार सावधपणाने वागले पाहिजे. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त, हे कर्माचे चार विभाग आहेत.
कर्म करत असताना वृत्ती सावध राखली पाहिजे. कर्म करायचे वर्म मी तुला अभिनव पद्धतीने सांगतो. नित्य आणि नैमित्तिक कर्म अगदी आवश्यक आहे. ते प्रत्येकाला केलेच पाहिजे. ते कर्म, फलाची अपेक्षा न धरिता, यथाविधि आचरावे. नित्य कर्म म्हणजे रोज करायची कामे तसेच नैमित्तिक कर्मे म्हणजे काही निमित्याने करावयाची कामे. नित्यकर्म जसजसे वाढत जाते तसतसे नैमित्तिक कर्मही वाढू लागते. त्यातून विषयप्राप्तीच्या इच्छेने काम्य कर्म करायला कधी सुरुवात होते ते कळतही नाही. त्यामुळे हळूहळू नित्य, नैमित्तिक कर्मे अपेक्षेने केली जातात आणि त्यांचे निषिद्ध कर्मात रूपांतर होते. असे होऊ नये म्हणून फलाचा अभिलाष न धरिता नित्य, नैमित्तिक कर्म निरपेक्षतेने करून कृष्णार्पण करावीत. काम्य म्हणजे सकाम कर्माचा निःशेष त्याग करावा. त्यासाठी मनात काही इच्छा ठेवू नये एरव्ही, मनात इच्छा ठेवून काम्य कर्माचा त्याग करता येत नाही. मनात अनेक इच्छा ठेवून बाहेरून लोकांना विरक्ती दाखवणारे ढोंगी लोक त्याग या शब्दाची विटंबना करतात. त्यांच्या मनात नाना इच्छा असल्याने त्यांच्या पूर्तीसाठी ते करू नये ती म्हणजे, निषिद्ध कर्मे करू लागतात. म्हणून मुळातच काही इच्छा ठेवल्या नाहीत की, निषिद्ध कर्मे घडण्याचा बिलकुल संभव नाही. पण इच्छा करायच्याच नाहीत असे कितीही ठरवले तरी माणसाच्या मनात इच्छा उमटतातच व निषिद्ध कर्म करायचा मोह झाल्याशिवाय रहात नाही. त्यावर उपाय म्हणजे आपण निषिद्ध कर्म करतो आहोत असे लक्षात आले की लगेच हरिनामाची गर्जना करावी. म्हणजे निषिद्ध कर्मे बारा वाटांनी पळून जातात. कारण हरिनाम घेतले की, मनात आलेल्या इच्छेमुळे निषिद्ध कर्म करावे असे वाटलेले असते त्या चुकीचे प्रायश्चित्त घेतल्यासारखे होते. जेथे हरिनामाचा प्रेमकल्लोळ सुरू असतो, तेथे निषिद्ध तत्काळ जळून जाते. निषिद्ध कर्म भक्ताजवळ कधीच येत नाही. कारण ईश्वर आपल्या भक्तांचे रक्षण करतो. कोटी प्रायश्चित्ते एका नामोच्चाराने घडतात, ही जी गुप्त गोष्ट मी तुला सांगितली ती जगात तू कोठेही प्रगट करू नकोस. पोटात ठेव. आता, नित्य आणि नैमित्तिक कर्माबाबत ऐक. ईश्वरार्पणबुद्धीने नित्यनैमित्तिक कर्मे अवश्य करावीत. ती मनाला निर्मळ करणारी असून, परमार्थाचे मुख्य साधन
आहेत.
स्वधर्माचरणाने जन्माचे साफल्य होते आणि परमार्थाचे फळ मिळते. सोन्यातील हिणकसपणा नाहीसा करण्यासाठी त्याच्या आगीचे पूट दिले म्हणजे ते शुद्ध होऊन आपल्या तेजाने झळकू लागते. त्याप्रमाणे स्वधर्म मला अर्पण केला म्हणजे त्याचे कर्म सफळ होते. हे गुह्य वर्म कर्मठांना माहीत नसल्यामुळे, त्यांना कर्माचा भ्रम मोठा असतो. मला कर्म अर्पण करणे प्रथमतः अवघड वाटेल. पण ज्याने मला सर्वस्व दिले आहे त्याला ते सहज शक्मय आहे. किंबहुना त्याचे कर्म आपोआपच मला अर्पण होते. जसे एखाद्या वाहनात बसून काहीही न करता आपण पुढे जात राहतो तसेच! याप्रमाणे निष्काम होऊन सुखाने स्वधर्माचरण करावे. त्याच्या योगाने रजतमाला सांडून, सत्त्वाच्या योगाने मनुष्य पुरुषोत्तमाला जाऊन मिळतो.