कुरुब समाजातील नेत्यांचा राज्य-केंद्र सरकारला इशारा
प्रतिनिधी/ बेंगळूर
कुरुब (धनगर) समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावे. जर ही मागणी मान्य न केल्यास यापुढेही आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, अशा ईशारा राज्य व केंद्र सरकारला देण्यात आला आहे. बेंगळुरातील आंतरराष्ट्रीय वस्तू प्रदर्शन मैदानावर रविवारी आयोजित भव्य मेळाव्यात धनगर समाज बांधवांनी शक्तीप्रदर्शन करून समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची मागणी केली.
कोगिनेलेहून 15 जानेवारीपासून कनकगुरु पीठाच्या निरंजनानंदपुरी स्वामीजींच्या नेतृत्त्वाखालील काढण्यात आलेली आंदोलक समितीची पदयात्रा रविवारी बेंगळूरला पोहोचली. यानंतर तुमकूर रस्त्यावरील आंतरराष्ट्रीय वस्तू प्रदर्शन मैदानावर पदयात्रेचे मेळाव्यात परिवर्तन झाले. या मेळाव्यात होसदुर्ग शाखा मठाचे ईश्वरानंदपुरी स्वामीजी, मंत्री एम. टी. बी. नागराज, आर. शंकर, भैरती बसवराज, माजी मंत्री एच. विश्वनाथ, एच. एम. रेवण्णा, बंडेप्पा काशंपूर, आंदोलक समितीचे राज्याध्यक्ष के. विरुपाक्षप्पा, कार्याध्यक्ष के. मुकुडप्पा यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी सहभागी होऊन कुरुब समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची जोरदार मागणी केली.
यावेळी बोलताना माजी मंत्री एच. विश्वनाथ म्हणाले, कुरुब समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी कोणत्याही अध्ययनाची आवश्यकता नाही. राज्य सरकारने तात्काळ केंद्राकडे याची शिफारस करावी. केंद्र सरकारने याला संमती देऊन कुरुब समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा. कुरुब समाजाने विश्वास ठेवून ज्यांना मुख्यमंत्री केले, तेच या मेळाव्यात सहभागी झाले नाहीत, असे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.
आरक्षणप्रक्रिया नियमानुसार होणे गरजेचे
मेळाव्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री के. एस. ईश्वरप्पा म्हणाले, राज्यातील चार जिल्हय़ांमध्ये कुरुब समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात आला आहे. आता सर्वच जिल्हय़ांमध्ये समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याचा आमचा आग्रह आहे. आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य योग्य आहे. आपण मंत्री असूनही राज्य अथवा केंद्र सरकारवर कोणताच दबाव टाकणार नाही. आरक्षणप्रक्रिया नियमानुसार होणे गरजेचे आहे. समाजातील नागरिकांना सर्व शासकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी धनगर समाज बांधव आंदोलन करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
कुरुब समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईल. समाजात अनेक गरीब कुटुंबे आहेत. त्या सर्वांनाच सरकारच्या सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. समाजातील नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी स्वामीजींच्या नेतृत्त्वाखाली पदयात्रा काढण्यात आली असून समाजाच्या भावना व्यक्त करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असेही ईश्वरप्पा म्हणाले.