राज्याचे मंत्री अन् आमदार पोहोचले दिल्लीत : पक्षाची 3 सदस्यीय समिती करणार चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि त्यांच्याच मंत्रिमंडळात मंत्री राहिलेले नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात सुरू असलेला तणाव दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेसने याकरता तीन सदस्यीय समिती तयार केली आहे. तसेच राज्यातील मंत्री-आमदारांना दिल्लीत बोलाविण्यात आले आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासह 25 आमदार सोमवारी दिल्लीत पोहोचले आहेत. समिती प्रत्येकाशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहे. उर्वरित मंत्री आणि आमदारांशी समिती मंगळवारी संवाद साधला जाणार आहे.
काँग्रेसमधील कलह संपविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत मल्लिकार्जुन खर्गे, जयप्रकाश अग्रवाल आणि हरिश रावत सदस्य आहेत. ही समिती काँग्रेस नेत्यांसोबत बैठक घेत त्यांचे मत जाणून घेणार आहे. ही बैठक तीन हिस्स्यांमध्ये होणार आहे. एका हिस्स्यात मंत्री आणि आमदार आहेत. दुसऱया हिस्स्यात पक्षाचे खासदार, राज्यसभा सदस्य आणि प्रदेशाध्यक्ष असतील. तिसऱया हिस्स्यात समिती मुख्यमंत्री अमरिंदर यांच्याशी चर्चा करणार आहे.
सिद्धू यांना सोमवारच्या आमदारांच्या बैठकीत सामील करण्यात आलेले नाही. यामुळे सिद्धू मंगळवारी समितीसमोर उपस्थित राहणार आहेत. 8 मंत्री आणि उर्वरित आमदारही मंगळवारी समितीसमोर भूमिका मांडणार आहेत. पंजाबमध्ये काँग्रेसचे 80 आमदार आहेत.
काँग्रेसमधील वादाचे कारण
2015 मधील गुरु ग्रंथ साहिबच्या अवमानाच्या घटनेनंतर कोटकपूरामध्ये आंदोलन करणाऱया लोकांवर झालेल्या गोळीबारावरून पंजाब सरकारने एसआयटी स्थापन केली होती. मागील महिन्यात उच्च न्यायालयाने या एसआयटीचा अहवाल फेटाळल्यापासून काँग्रेसमधील कलह पेटला आहे. ऍडव्होकेट जनरलनी न्यायालयात योग्यप्रकारे बाजू मांडली नसल्याचा आरोप काँग्रेसमधील एका गटाने केला आहे. तर सिद्धू याप्रकरणी सातत्याने अमरिंदर यांना लक्ष्य करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कॅबिनेट मंत्री सुखजिंदर सिंग रंधावा, चरणजीत सिंग चन्नी, आमदार नवज्योत सिंग सिद्धू, खासदार प्रताप सिंग बाजवा, खासदार रवनीत बिट्टू एकवटले आहेत.