युएनएनसीचे अध्यक्षस्थान मिळविणारे प्रथम भारतीय पंतप्रधान
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे (युएनएससी) अध्यक्षस्थान स्वीकारण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. हे अध्यक्षस्थान स्वीकारणारे ते गेल्या 74 वर्षांमधील प्रथमच भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. भारताची रविवारी सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. सदस्य देशांमधून ही निवड आळीपाळीने। करण्यात येते. भारताच्या परराष्ट्र विभागाने ही माहिती दिली.
सध्या कोरोना परिस्थिती असल्याने पंतप्रधान मोदी सुरक्षा परिषदेला अध्यक्ष या नात्याने ऑनलाईन संबोधित करणार आहेत. भारताने रविवारी फ्रान्सकडून या परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारले. यामुळे प्रथेप्रमाणे भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील (युनो) प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी फ्रान्सच्या प्रतिनिधीचे आभार मानले. भारताला या परिषदेचे अध्यक्षस्थान मिळावे म्हणून फ्रान्सने विशेष प्रयत्न केले होते. तसेच भारताला पाठबळ दिले होते. यासंबंधी भारताने कृतज्ञता व्यक्त केली.
दहशतवादमुक्त जग ही प्राथमिकता
जगातून दहशतवाद संपला पाहिजे, ही भारताची भूमिका आहे. भारत अनेक दशकांपासून दहशतवादाचा त्रास सहन करत आला आहे. कोणत्याही देशाने, कोणत्याही कारणास्तव दहशतवादाला आपल्या भूमीत थारा देता कामा नये. तसेच दहशतवाद्यांना किंवा त्यांच्या संघटनांना आर्थिक साहाय्य, प्रशिक्षण किंवा शस्त्रे पुरवू नयेत, असा आग्रह भारताने अनेक दशके धरला आहे. त्यामुळे आता भारताला सुरक्षा परिषदेचे अध्यक्षस्थान मिळाल्यानंतर भारताने दहशतवादमुक्त जग ही आपली प्राथमिकता निश्चित केली असून सर्व जगाने दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी एकत्रित कार्य केले पाहिजे, यावर भारत जोर देणार आहे.
तीन स्वाक्षरी बैठका
आपल्या अध्यक्षीय कार्यकाळात भारत तीन स्वाक्षरी बैठका (सिग्नेचर मिटींग्ज) आयोजित करणार आहे. समुद्री सुरक्षा, शांततानिर्धारण आणि दहशतवादविरोध अशा या तीन स्वाक्षरी बैठका असतील. जगात शांतता नांदण्यासाठी ज्या शांतता सैनिकांनी प्रयत्न केले आणि आत्मबलिदान केले त्यांच्यासाठी भारत एका विषेश कार्यक्रमाचे आयोजन आपल्या अध्यक्षीय कार्यकाळात करणार आहे.
महत्वाचे प्रस्ताव
भारताच्या अध्यक्षीय कार्यकाळात सुरक्षा परिषदेसमोर अनेक महत्वाचे प्रस्ताव विचारार्थ येणार आहेत. सोमालिया आणि माली या देशांमधील सशस्त्र संघर्ष, लेबेनॉन मधील संयुक्त राष्ट्रसंघाची शांतीसेना, तसेच सिरीया, इराक, सोमालिया, येमेन आणि मध्यपूर्व यांच्यासंबंधातील इतर प्रश्नही परिषदेसमोर येणार आहेत.
भारताचा कालावधी 2 वर्षे
भारताच्या सुरक्षा परिषदेचा अध्यक्षीय कार्यकालाचा प्रारंभ या परिषदेचा अस्थायी सदस्य या नात्याने 1 जानेवारी 2021 या दिवसापासून झाला आहे. हा कालावधी 2 वर्षांचा आहे. मधल्या काळात कोरोनास्थितीमुळे परिषदेची बैठक झाली नव्हती. आता ती होणार आहे. भारताच्या अध्यक्षीय कार्यकालातील प्रथम कार्यदिवस 2 ऑगस्ट 2021, अर्थात आज सोमवारी आहे, अशीही माहिती देण्यात आली.