नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मागील पंधरवडय़ात महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱया लाटेने थैमान घातले होते. तथापि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लावलेल्या कडक निर्बंधांमुळे राज्यात परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोरोना लढय़ाचे कौतुक केले आहे. पंतप्रधानांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करत महाराष्ट्राची पाठ थोपटली. कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱया लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही महाराष्ट्रातील संसर्ग नियंत्रणाबाबत केंद्र सरकारसह इतर राज्यांना कौतुकाचे बोल सुनावले होते.
पंतप्रधानांनी शनिवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. रेमडेसिवीर इंजेक्शन्स, ऑक्सिजन, लॉकडाऊन, 18 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण आणि राज्यातील वाढत्या मृत्यूंसंबंधी पंतप्रधानांनी माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिस्थिती पंतप्रधानांना अवगत करतानाच राज्यांच्या गरजाही पंतप्रधानांसमोर मांडल्या. कोरोना स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज बैठका घेत असून विविध राज्यांमधील स्थितीवर नजर ठेवून आहेत. शनिवारी पंतप्रधानांनी महाराष्ट्र, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यापूर्वी शुक्रवारी मणिपूर, त्रिपुरा आणि सिक्किमच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत परिस्थितीची माहिती घेतली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही विशेषतः महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली. तसेच तिसरी लाट रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पूर्वतयारीसंबंधीही विविध उपाययोजनांची माहिती दिली. पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढय़ात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्राने मान्यही केल्या, याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
देशातील सर्वाधिक संक्रमित राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रात साथीच्या दुसऱया लाटेमुळे वाईट स्थिती आहे. मात्र, आता मुंबईसह इतरही अनेक शहरांमध्ये परिस्थिती पूर्ववत झाली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 54 हजाराहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून बीएमसीच्या कामाचे कौतुक
मुंबईतील ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थापनाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने बीएमसी म्हणजे मुंबई महापालिकेच्या कार्याचे कौतुक केले आहे. एकीकडे देशभरात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनसाठी संघर्ष सुरू असताना मुंबई महानगरपालिकेने रुग्णांसाठी ऑक्सिजन कसे व्यवस्थापित केले याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केले होते.