राज्यातील भाजप नेत्यांची बैठक, अधिकारी-नड्डा यांची भेट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर सत्ताधारी पक्षाशी संबंधित असणाऱया गुंडांनी हैदोस घातला आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. या राज्यातील भाजपचे प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांनी यासंदर्भात पक्षाची पुढची दिशा ठरविण्यासाठी नेते व कार्यकर्ते यांची बैठक आयोजित केली होती.
मंगळवारी झालेल्या या बैठकीत हिंसाचारामुळे झालेल्या हानीचा आढावा घेण्यात आला. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर कोसळलेल्या संकटांची माहिती दिली. हजारो कार्यकर्त्यांची घरे जाळली गेली असून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना राज्य सोडून जाण्यास भाग पाडण्यात येत आहे. हजारो तक्रारी पोलीसांकडे सादर केल्या असूनही त्या नोंदवून घेण्यास नकार दिला जात आहे. महिला व मुलांनाही लक्ष्य केले जात आहे. हिंसाचार अजूनही सुरूच असून सत्ताधारी पक्ष त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे, असे आरोप घोष यांनी पत्रकारांसमोर केले.
अधिकारी दिल्लीत
पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांची भेट घेतली. राज्यातील स्थिती भयावह असून पक्षाच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे. राज्य भाजप सर्व पक्षकार्यकर्त्यांच्या पाठीशी असून त्यांच्या संरक्षणासाठी शक्य ते सर्व उपाय करण्यात येत आहेत. केंद्र सरकारही योग्य वेळी योग्य पावले उचलणार आहे, असे अधिकारी यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. अधिकारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा केली असून बुधवारी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून राज्यातील स्थिती स्पष्ट करणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाची फटकार
सर्वोच्च न्यायालयाने कोरोना स्थितीसंबंधी पश्चिम बंगाल सरकारला चांगलेच फटकारले आहे. कोरोनामुळे ज्या मुलांवर निराधार होण्याची वेळ आली आहे, त्यांचे पालन-पोषण आणि शिक्षण यांचे उत्तरदायित्व राज्य सरकारांनी घ्यावे असा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यासाठी अशा मुलांची सूची इंटरनेटवर प्रसिद्ध करावी असाही आदेश देण्यात आला होता. तथापि, पश्चिम बंगालकडून या आदेशाचे पालन न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या आदेशाचे पालन त्वरित करा असेही सर्वोच्च न्यायालयाने बजावले.