मोदींसह 7 जागतिक नेत्यांचे फलक झळकले- सिंधूदेश
वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी उघडपणे जागतिक नेत्यांची मदत मागितली आहे. आधुनिक सिंधी राष्ट्रवादाच्या संस्थापकांपैकी एक जीएम सैयद यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त जामशोरो प्रांतात एक भव्य रॅली काढण्यात आली, यादरम्यान लोकांनी स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या तसेच या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य जागतिक नेत्यांचे फलकही झळकले आहेत.
सिंध प्रांत सिंधू खोरे संस्कृती आणि वैदिक धर्माचे घर आहे. ब्रिटिशांनी येथे बळजबरीने कब्जा केला होता आणि 1947 मध्ये पाकिस्तानच्या इस्लामिक हातात हा प्रांत सोपविल्याचे रॅलीत सामील लोकांनी म्हटले आहे.
जागतिक नेत्यांचे फलक
नरेंद्र मोदी (भारताचे पंतप्रधान), जो बायडेन (अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष), एंटोनियो गुतेरेस (संयुक्त राष्ट्रसंघ अध्यक्ष), जेसिंडा आर्डर्न (न्यूझीलंडच्या पंतप्रधान), अशर्रफ गनी (अफगाणिस्तानचे अध्यक्ष), अँजेला मर्केल (जर्मनीच्या चॅन्सेलर) या नेत्यांचे फलक या रॅलीत झळकले आहेत.
क्रूर हल्ले तरीही ओळख टिकविली
जेई सिंध मुत्ताहिदा महाजचे अध्यक्ष शफी मुहम्मद बर्फात यांनी रॅलीला संबोधित पेले. इतिहास आणि संस्कृतीवर सर्व क्रूर हल्ल्यानंतरही सिंधने स्वतःची बहुलवादी, समकालीन, सहिष्णू आणि सामंजस्यपूर्ण समाजाच्या स्वरुपात स्वतःची वेगळी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख कायम ठेवली आहे. सिंधमध्ये विदेशी भाषा आणि विचारांना मुक्त वाव मिळाला असल्याचे बर्फात यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या अत्याचाराने ग्रस्त
सिंधने भारताला स्वतःचे नाव दिले. सिंधचे नागरिक उद्योग, सागरी संचार, गणित आणि खगोलशास्त्रात धुरंधर होते, परंतु आज पाकिस्तानच्या फॅसिस्ट दहशतवाद्यांच्या राज्यात राहण्याची वेळ सिंधवासीयांवर आली आहे. स्वतंत्र सिंध देशाला पाठिंबा देणारे अनेक राष्ट्रवादी पक्ष येथे आहते. आम्ही आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हा मुद्दा उपस्थित करत आलो आहोत. पाकिस्तानने आमच्यावर कब्जा केला असून आमच्या साधनसंपदेची लूट सुरू आहे, तसेच मानवाधिकार उल्लंघनही होत असल्याचे बर्फात म्हणाले.
1967 पासून संघर्ष
सिंधला स्वतंत्र देश करण्याची मागणी 1967 पासून होत आहे. जीएम सैयद आणि पीर अली मोहम्मद राशिद यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदेश आंदोलनाची सुरुवात झाली होती. मागील काही दशकांमध्ये पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी तेथे नृशंस हत्याकांड चालविले आहे. पाकिस्तानी सैन्याकडून मोठय़ा संख्येत राष्ट्रवादी नेते, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांचे शिरकाण करण्यात आले आहे.