- शरद पवार यांच्या नुकसान पाहणी दौऱ्याचा दुसरा दिवस
ऑनलाईन टीम / तुळजापूर :
अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रावर ऐतिहासिक आर्थिक संकट आले आहे. या आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यामुळे कर्ज काढून त्यांना मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज केली. तुळजापूर दौऱ्यानंतर पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून कर्ज काढण्यासाठी आग्रह करणार आहे. राज्यावर आलेले संकट हे महाराष्ट्रावर आलेले आर्थिक संकट आहे. शेतकऱ्यावर आलेले संकट हे दीर्घ परिणाम करणारे संकट आहे. हे नुकसान भरून काढण्यास कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाही. असेही पवार यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, अतिवृष्टीच्या संकटाला संपूर्ण महाराष्ट्र तोंड देत आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये उस्मानाबाद, लातूर, नांदेड, पंढरपूर, इंदापूरमध्ये आदी जिल्ह्यांमध्ये जास्त नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा उसाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात ऊस गाळपासाठी वापरता येणार नाही.
संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा संकट आल्याचे चित्र आहे. सोयाबीनचे पीक अतिवृष्टीने उद्ध्वस्त झाले आहे. सोयाबीन उत्पादकांचे संपूर्ण वर्ष वाया गेले. तसेच साखर कारखानदारी सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार, त्यामुळे हा ऊस गाळीपासाठी लवकरात लवकर नेता येईल आणि शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पिक विम्याच्या निकषाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पिक विम्यासंदर्भात शिथिलता देण्यासाठी केंद्राकडे मागणी करणार आहे. तसेच वाहून गेलेल्या पिकासंदर्भात तरतूद करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री मुंबई का सोडत नाहीत या प्रश्नाचे उत्तर देताना शरद पवार म्हणाले, आम्हीच ठाकरेंना एका ठिकाणी बसून नियोजन करण्याची विनंती केली. प्रशासनाला नियोजन करून निर्णय घ्यावे लागतात असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.