बेळगाव / प्रतिनिधी
लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तू नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस प्रशासनाने पासचे वितरण केले आहे. मात्र पास आणि बिगर पासच्या फेरीवाल्यांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. गल्लोगल्ली हातगाडय़ांच्या माध्यमातून फळे आणि भाजीपाला विक्रीसाठी ठाण मांडले असल्याने फेरीवाल्यांसाठी लॉकडाऊन नाही का, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्यात आले आहे. पण लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तुंसाठी नागरिकांना धावपळ करावी लागत आहे. काही ठिकाणी साहित्य नसल्याने जादा दराने खरेदी करावी लागत आहे. तर काही व्यावसायिकांना साहित्य आणण्यासाठी बाहेर पडणे मुश्कील बनले असल्याने दुकाने बंद ठेवली होती. जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा भासत असल्याने जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी मुभा देण्यात आली आहे. विविध ठिकाणी व्यवसाय करणाऱया व्यावसायिकांना पासचे वितरण केले आहे. मात्र याकरिता विविध अटी घालण्यात आल्या आहेत. पण पोलीस प्रशासनाने घातलेल्या अटी आणि नियमावली धाब्यावर बसवून व्यावसायिकांनी बाजारपेठेत ठाण मांडले आहे. काही व्यावसायिकांनी तर लॉकडाऊन काळात फायदा घेण्यासाठी व्यवसाय सुरू ठेवले असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तु उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने पासचे वितरण करून व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण काहींनी या परवानगीचा दुरुपयोग करून दुप्पट दराने साहित्याची विक्री चालविली असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.
नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास
बाजारपेठेत पास आणि बिगर पासच्या फेरीवाल्यानी ठिकठिकाणी हातगाडय़ा लावून भाजी आणि फळविक्रीचा व्यवसाय सुरू ठेवला आहे. सामाजिक अंतर ठेवण्याची तसेच एकाच ठिकाणी थांबून व्यवसाय करू नये, अशी सूचना करण्यात आली आहे. पण याकडे दुर्लक्ष करून गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक आणि टिळक चौक अशा विविध ठिकाणी फेरीवाल्यांनी व्यवसाय सुरू केले आहेत. तसेच साहित्याची विक्री करताना तोंडाला मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हॅण्डग्लोज घालून साहित्य देणे गरजेचे आहे. पण या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकाच ठिकाणी गर्दी करीत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून त्यांना सूचना देखील करण्यात येत आहेत.
परवानगीचा दुरुपयोग
संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांकडून सातत्याने गस्त घालण्यात येत आहे. गस्त घालताना स्पिकरद्वारे विविध सूचना करण्यात येत आहेत. काही फेरीवाले याकडे दुर्लक्ष करीत आहेत. व्यवसाय बंद ठेवला तर उदरनिर्वाह कसा करायचा, अशी विचारणा करून बाजारपेठेत ठाण मांडून रहात आहेत. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या परवानगीचा दुरुपयोग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सकाळी 11 नंतर व्यवसाय बंद करण्यासाठी सक्ती करण्यात येत आहे. पण पोलीस जाताच पुन्हा व्यवसाय सुरू करीत आहेत.