राज्यातील हिंसाचारावर पुन्हा नाराज
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या 43 मंत्र्यांनी सोमवारी पदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळय़ात राज्यपाल धनखड यांनी पुन्हा एकदा बंगालमधील हिंसाचारावरून नाराजी व्यक्त केली आहे. हिंसाचारावरून राज्य सरकारकडून जबाबदारीचे वर्तन दिसून आले नाही. सरकारलाही हिंसाचार हवा होता असे स्थितीवरून जाणवते. राज्यात घटनेची पायमल्ली होत आहे. रात्री हिंसाचाराच्या बातम्या मिळतात आणि सकाळी सर्व काही सुरळीत असल्याचे सांगण्यात येते असे म्हणत राज्यपालांनी ममतांना लक्ष्य केले आहे. राज्यपालांनी यापूर्वी 5 मे रोजी ममता बॅनर्जी याच्या शपथविधीच्या दिनीही हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता.
सरकारने वस्तुस्थिती समजून घेत राज्यातील जनतेमध्ये विश्वास निर्माण करावा. लोकशाहीच्या धाग्यांना तोडण्याचा प्रयत्न करणाऱया गुन्हेगारांवर सरकारने कारवाई करावी. राज्य सरकारकडून हिंसाचाराप्रकरणी कुठल्याही प्रकारची जबाबदारी तसेच उत्तरदायित्व दिसून आले नसल्याचे राज्यपाल म्हणाले.
अहवाल नाकारला
कोलकाता पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱयांकडून 3 मे रोजी अहवाल मागविला. त्याचदिवशी राज्याच्या मुख्य सचिवांकडून स्थिती सुधारण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांचा तपशील मागविल होता. अधिकाऱयांनी अतिरिक्त मुख्य गृहसचिवांना अहवाल पाठविला, पण त्यांनी आजपर्यंत अहवाल उपलब्ध केला नसल्याचा आरोप राज्यपालांनी केला आहे.
केवळ हजेरी लावली
मुख्य सचिवांना फोन करून बोलवावे लागले. मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक भेटायला आले, पण त्यांच्याकडे कुठलाच अहवाल नव्हता तसेच माहितीही नव्हती. मुख्य गृह सचिवांनी स्वतःचे कर्तव्य बजावले नाही. मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक केवळ हजेरी लावण्यासाठी माझ्याकडे आले होते, हा केवळ देखावा होता अशी व्यथा राज्यपालांनी मांडली आहे.
हेलिकॉप्टर देण्यासही नकार
हिंसाग्रस्त भागांमध्ये जाण्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी केली असता याचे कुठलेच लेखी उत्तर मिळाले नाही. अनधिकृतपणे हेलिकॉप्टरमध्ये बिघाड असून वैमानिकाबाबत समस्या असल्याचे कळविण्यात आले. घटनात्मक प्रमुखाला माहिती देण्याची ही पद्धत आहे का असे प्रश्नार्थक विधान त्यांनी केले आहे.
विरोधी कार्यकर्त्यांची होतेय हत्या
निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये प्रचंड हिंसाचार होत आहे. राज्यात हत्या अणि बलात्कार होत आहेत. विरोधी पक्षांचे उमेदवार, कार्यकर्ते आणि त्यांना मतदान करणाऱयांना स्वतःचा जीव गमवावा लागत आहे. मी या स्थितीकडे डोळेझाक करू शकत नाही. राज्यात घटनेची पायमल्ली होत आहे. बंगालमध्ये सरकारला घटनेनुसार चालविणे माझ्यासाठी अत्यंत अवघड ठरत असल्याचे उद्गार राज्यपाल धनखड यांनी काढले आहेत.