ऑनलाईन टीम / पटना
देशात दिवसें – दिवस बलात्काराच्या घटनांचे सत्र न थांबता सुरुच असुन यामुळे गुन्हेगारांवर जरब बसावी यासाठी कायदा व्यवस्था काय करु शकते का ? या अपेक्षा देशातील नागरिक न्यायव्यवस्थेकडून करत आहेत. मात्र देशातील अनेक न्यायालयात अनेक महत्त्वाचे असे खटले प्रलंबित असल्याचे चित्र आहे.
पण साक्ष, वाद-विवाद आणि निर्णय हे सर्व एकाच दिवसात दिल्याचा प्रकार बिहार न्यायालयात पाहायला मिळाला आहे. बिहारमधील अररिया जिल्हा न्यायालयाने एकाच दिवसात निकाल देत देशासमोर आदर्श निर्माण केला आहे. पोक्सो कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्याची सुनावणी करताना जिल्हा न्यायालयाने साक्ष व युक्तिवाद ऐकून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यामुळे न्यायालयाच्या या निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. न्यायाधीश शशिकांत राय यांनी हा निर्णय दिला आहे.
२२ जुलै रोजी मुलीवर बलात्कार झाला होता. या प्रकरणाचा तपास अररिया महिला पोलिस स्टेशनच्या प्रभारी रिता कुमारी यांनी केला होता. पत्रकारांशी संवाद साधताना सरकारी वकील श्यामलाल यादव म्हणाले, “अररिया येथील खटला हा देशातील बलात्काराच्या खटल्याचा सर्वात वेगवान खटला होता. या खटल्याने मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील एका न्यायालयाचा विक्रम मोडीत काढला.” त्यामुळे बलात्कारी मानसिकतेवर जरब बसवण्यासाठी हा निर्णय खुप महत्त्वाचा ठरणार आहे.