कोरोनामुळे यंदा भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातीत खेळवल्या जाणाऱया आयपीएल स्पर्धेत ‘बायो-बबल’ची कडक अंमलबजावणी केली जात आहे आणि याचाच एक भाग म्हणून बीसीसीआयने बायो-बबलचा भंग करणारे खेळाडू व त्यांचा संघ यांच्यासाठी मोठा दंड जाहीर केला आहे. यानुसार, एखाद्या खेळाडूने बायो-बबलचा भंग केला तर त्याची स्पर्धेतून हकालपट्टी होऊ शकते. त्याचप्रमाणे त्या संघाला थोडाथोडका नव्हे तर 1 कोटी रुपयांचा दंड होऊ शकतो. बीसीसीआयने सर्व प्रँचायझींना याबाबत पत्रकाद्वारे माहिती दिली.
एखाद्या खेळाडूने ‘अनधिकृत निर्गमन’ केले, अर्थात बायो-बबलमधून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला तर सहा दिवसांचे क्वारन्टाईन पूर्ण करावे लागेल. दुसऱयांदा भंग केल्यास एका सामन्याची बंदी लादली जाईल आणि तिसऱयांदा बायो-बबलमधून बाहेर गेल्यास स्पर्धेतून हकालपट्टी केली जाणार आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या खेळाडूला स्पर्धेतून बाहेर केले गेले तर त्याच्याऐवजी संबंधित संघाला पर्यायी खेळाडू घेता येणार नाही.
खेळाडूंना रोज प्रकृती स्वास्थाची माहिती देणे आवश्यक आहे. ते न केल्यास, जीपीएस ट्रकरचा अवलंब न केल्यास व पूर्वनियोजित कोव्हिड-19 चाचणीला हजर न राहिल्यास संबंधित खेळाडूला 60 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. खेळाडूंचे कुटुंबिय व संघातील सहायक यांनाही हा नियम लागू आहे. बायो-बबलचा भंग होऊ नये, यासाठी प्रँचायझींनाही कडक सूचना करण्यात आल्या आहेत.
प्रँचायझीने बाहेरील एखाद्या व्यक्तीला खेळाडू किंवा सहायक पथकातील सदस्याशी संवाद साधण्याची संधी दिली तर अशा परिस्थितीत त्या प्रँचायझीला 1 कोटी रुपयांचा दंड होऊ शकतो. दुसऱयांदाही अशी आगळीक झाली तर संघाचा एक गुण कापला जाईल तर तिसऱयांदा चूक केल्यास एका विजयाइतके म्हणजे दोन गुण कापले जाणार आहेत. चेन्नईच्या पथकातील 2 खेळाडूंसह 13 सदस्य कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्यानंतर याची पुनरावृत्ती झालेली नाही. पण, एखादा संघ अशा अडचणीमुळे 11 सदस्यांचा संघही उतरवू शकत नसेल तर तो सामना नव्याने आयोजित केला जाईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले. अर्थात, तूर्तास तरी अशी परिस्थिती उद्भवण्याचे संकेत नाहीत.