प्रतिनिधी / बेळगाव
राज्यातील परिवहन कर्मचाऱयांनी 7 एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. कर्मचाऱयांच्या मागण्या अद्याप पूर्ण न झाल्याने हा संप सुरूच आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासोबतच जवळच्या प्रवासासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करत खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. हा धोकादायक प्रवास टाळण्यासाठी प्रवाशांनी आता रेल्वेचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे बेळगाव रेल्वेस्थानकावरून प्रवास करणाऱया प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
पगारवाढीसह आपल्या इतर मागण्यांसाठी राज्यातील परिवहन कर्मचारी संपावर गेले आहेत. राज्य सरकारने काही मोजक्मया बस सुरू करण्याचा प्रयत्न केला असला तरी अद्याप त्याला यश आलेले नाही. सरकारने खासगी वाहनांची सोय केली असली तरी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरणे तसेच अव्वाच्या सव्वा तिकीट आकारणे असे प्रकार घडत आहेत. सध्या कोरोनाचा धोका असल्याने अशा वाहनांमधून सामाजिक अंतर न राखता प्रवास करणे धोकादायक असल्याने प्रवाशांकडून रेल्वेला प्रतिसाद दिला जात आहे. बेळगाव रेल्वे स्थानकातून सध्या बेंगळूर, म्हैसूर, मुंबई, पुणे, हजरत निजामुद्दीन (दिल्ली) या मार्गांवर रेल्वे धावत आहेत. यामुळे प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे ठरत आहे. लांब पल्ल्याच्या मार्गांवर परिवहनच्या बस बंद असल्याने प्रवाशांना रेल्वेने प्रवास करावा लागत आहे. रेल्वे प्रवासात सामाजिक अंतर राखले जात असून वाहतूकही सुरक्षित असल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी वाढत आहे.
नैर्त्रुत्य रेल्वेकडून सोडण्यात आल्या होत्या विशेष रेल्वे
नुकताच झालेला गुढीपाडवा व यामध्ये सुरू असणारा परिवहनचा संप यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने एकूण 18 विशेष रेल्वे सोडल्या होत्या. यातील काही रेल्वे या बेळगाववरून बेंगळूर व म्हैसूर शहरापर्यंत धावल्या. यामुळे प्रवाशांना लांब पल्ल्याचा प्रवास सोयीचा ठरला. या विशेष रेल्वेसोबतच सुरू करण्यात आलेल्या पॅसेंजर रेल्वेलाही प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद दिला जात आहे. हुबळी, धारवाड, लोंढा, कुडची, रायबाग, शेडबाळ, घटप्रभा, गोकाक येथून बेळगाव शहरात ये-जा करण्यासाठी पॅसेंजर उपयुक्त ठरत आहे.