तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बार्शी तालुक्यातील विविध उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक योजना याबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बार्शी तालुक्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेतला असता बार्शी तहसील कार्यालय या ठिकाणी आढावा बैठक घेतली यावेळी बार्शी तालुक्यातील आणि शहरातील विलगीकरण कक्षाची माहिती घेतली. त्यावेळी बार्शी शहरातील विलगीकरणं ची यंत्रणा पाहून खासदार चांगलेच संतप्त झाले आणि अधिकारी यांनाही खडे बोल सुनावले.
कोरोना चे संकट महाराष्ट्रात आल्यापासून गेली दोन महिने बार्शी तालुका हा कोरोना मुक्त होता परंतु जेव्हा प्रवासाचे पास देऊन प्रवास करण्याची मुभा दिली त्यावेळी मुंबई पुणे आणि इतर रेड झोन मधील भागातून अनेक नागरिक बार्शी तालुक्यात दाखल झाले . आता बार्शीत 12 कोरोना रुग्ण असून त्यातील एक मयत आहे तर एक रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे. मात्र बार्शीत कोरोना चा प्रसार हा बाहेरून आलेल्या व्यक्तीपासून झाला आहे. परंतु बार्शीत किती बाहेरचे प्रवासी आले त्यांची आकडेवारी नाही, त्यांना विलग केले नाही. आणि स्थापन झालेल्या विलगिकरण कक्षात सोयी सुविधा नाहीत या सर्व बाबी लक्षात घेत आज खासदार ओमराजे निंबाळकर चांगलेच संतापले. तर उपस्थित असलेल्या अधिकारी यांनाही खडे बोल सुनावत नाराजी व्यक्त केली.
भगवंत भरोसे सुरक्षित आहोत – खासदार ओमराजे
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दैनिक तरुण भारत संवादशी बोलताना सांगितले की बार्शी शहरात हजारो लोक बाहेरून आले आहेत आणि केवळ 180 जणांना संस्थात्मक विलगिकरण कक्षात ठेवले आहे. ही गंभीर बाब आहे आणि असेच राहील तर भगवन्त भरोसे राहावे लागेल प्रशासनाच्या नाही.