खानापूर / प्रतिनिधी
बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गाचा सुरवातीचा आराखडा बदलून आता सदर रेल्वे मार्ग देसूर, प्रभूनगर, गर्लगुंजी, नंदिहळळी मार्गे घालण्याचा घाट घालण्यात आला असून या मार्गाने सर्वेक्षणही सुरु करण्यात आले आहे. पण याला आता गर्लगुंजी, नंदिहळळी परिसरातील शेतकऱयांनी प्रखर विरोध केला असून यासंदर्भात गर्लगुंजी गावातील शेतकऱयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री पियुस गोवेल, राज्य मंत्री, सुरेश अंगडी तसेच जिल्हाधिकाऱयांना खानापूर तहसीलदारकरवी निवेदन पाठवले आहे. यासंदर्भात गर्लगुंजी भागातील शेतकऱयांनी सोमवारी उपतहसीलदार कोलकार यांची भेट घेऊन सदर निवेदन त्यांना दिले.
या निवेदनात असे म्हटले आहे की, या पूर्वी बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण यळळूर, हलगा, के. के. कोप्प, बागेवाडी मार्गे झाले होते. या मार्गातील जमीनही डोंगरगाळ व दगडमय असल्याने रेल्वेलाईन घालण्यासाठी तांत्रिक दृष्टय़ा अत्यंत योग्य होती. पण या मार्गावर काही जबाबदार नेते मंडळीच्या जमिनी असल्याने त्या जमिनी वाचवण्यासाठी त्या नेतेमंडळीनी आता रेल्वे मार्गाची दिशाच बदलली असून आता तो मार्ग बेळगाव, देसूर, प्रभूनगर, गर्लगुंजी, नंदिहळळी, अंकलगीमार्गे भरण्याचे सर्वेक्षण सुरु केले आहे. वास्तविक सर्वेक्षण करण्यापूर्वी कायदय़ाप्रमाणे संबंधित शेतकऱयांना नोटिसा देणे गरजेचे होते. पण कोणत्याही नोटिसा न बजावता, अचानकपणे सर्वेक्षण सुरु केले आहे. या सर्वेक्षणानुसार आता बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गासाठी देसूर, नंदिहळळी, गर्लगुंजी, नागेनहट्टी व इतर गावातील अत्यंत सुपिक जमीन काळी व सुपीक पिकाऊ जमीन जाणार आहे.
यासह जमिनीमध्ये ऊस, भात, गहू, ज्वारी, सोयाबीण, वाटाणे, बटाटे, रताळी, मका व विविध तऱहेचा भाजीपाला येणारी सुपीक जमीन आहे. तसेच सदर जमिनीत 30 ते 40 फूट पाणी असल्याने सदरी जमिनी रेल्वे मार्गासाठी उपयुक्त नसून एखाद्यावेळी या जमिनीतून रेल्वे मार्ग घालण्याचा प्रयत्न झाल्यास रेल्वे खात्याला फार मोठा तोटा तर सहन करावा लागणारच, शिवाय रेल्वे मार्गासाठी सदर जमीन ही अत्यंत धोकादायक देखील आहे. यामुळे सदर जमिनीतून रेल्वे मार्ग घालण्यास आमचा प्रखर विरोध आहे. तसेच या जमिनीतून रेल्वे मार्ग घालण्यासाठी रेल्वेला पूर्वीच्या मार्गापेक्षाही 1200 कोटी रुपये अधिक खर्च करावा लागणार आहे. यासाठी आमच्या सुपीक जमिनी गेल्या तर आमच्यावर कायमस्वरुपी उपासमारीची वेळ येणार असून याचा फेरविचार करुन पूर्वीच्याच सर्वेक्षणानुसार रेल्वेमार्ग करावा, एखाद्यावेळी आमच्या सुपीक जमिनीतून रेल्वे मार्ग घालण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू, प्रसंगी आत्महत्येचा मार्गही पत्करु, असे झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र व राज्य शासनावर राहील, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. उपतहसीलदार कोलकार यांनी निवेदन संबंधितांना पाठवण्याचे आश्वासन दिले.
सदर निवेदन प्रसाद व्ही. पाटील यांनी सादर केले. यावेळी त्यांच्यासंमवेत संगाप्पा कुंभार, पुंडलिक मेलगे, संतोष पटील, गणेश देसाई, सातेरी धामणेकर, परशराम कुंभार, निरंजन पाटील, बाळकृष्ण मेलगे यासह इतर शेतकरी उपस्थित होते.