24 तासात 209 मि. मी. पावसाची नोंद : औधनी, शराबी नद्यांना पूर ; 35 घरांमध्ये शिरले पाणी, जनजीवन विस्कळीत
प्रतिनिधी /कारवार
जिल्हय़ातील भटकळ तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात 209 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. परिणामी संपूर्ण भटकळ तालुका जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातून वाहणाऱया औधनी, शराबी नद्यांना पूर आला आहे. औधनी नदीतील पाणी पात्राबाहेर पडल्याने भटकळ तालुक्यातील बहुतांश भाग जलमय झाला आहे. तालुक्यातील सखल प्रदेशातील 35 घरांमध्ये यापूर्वीच पाणी घुसले आहे. अनेक घरांमध्ये पाणी घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. भटकळ शहरातून जाणाऱया राष्ट्रीय हमरस्ता क्र. 66 वरील पाण्याचा निचरा योग्यरित्या होत नसल्यामुळे नगरातील अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे भटकळ शहरातील सुप्रसिद्ध शमशुद्दीन सर्कल जलमय झाला आहे.
औधनी आणि शराबी नद्यांना पूर आल्याने भटकळ नगरालगतचे मडळ्ळी, रंगीनकट्टे, औधनी आदी भाग पाण्याने वेढला आहे. भटकळ तालुक्याला लागून असलेल्या होन्नावर तालुक्यातही जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने गुंडबाळ नदीला पूर आला आहे. त्यामुळे गुंडबाळ नदीच्या किनाऱयावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हय़ात ऑरेंज आणि यलो अलर्ट
कारवार जिल्हय़ाला गेल्या 8 ते 9 दिवसांपासून पावसाने झोडपून काढले आहे. हवामान खात्याने या अगोदर जोरदार पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे दि. 19 नंतर पावसापासून दिलासा मिळणार, अशी अपेक्षा जिल्हावासियांकडून व्यक्त केली जात होती. तथापि, हवामान खात्याने रविवारी आणि सोमवारी जिल्हय़ात ऑरेंज अलर्ट तर 21 आणि 22 तारखेला यलो अलर्ट जाहीर केला आहे. ऑरेंज आणि यलो अलर्टमुळे मच्छीमारी बांधवांना समुद्रात न उतरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
बेळगाव-कारवार राज्य हमरस्त्यावर चिखलाचे साम्राज्य
कारवार तालुक्यात होणाऱया जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे असनोटी ग्रामपंचायत व्याप्तीतील कोळगे येथे डोंगरावरील पाणी मातीसह बेळगाव-कारवार रस्त्यावर वाहून येत आहे. त्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्यान्0ाs वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत.