वार्ताहर/ संगमेश्वर
शुल्लक कारण तंटय़ाला कारणीभूत ठरले आणि गेली 25वर्षे वाडीतील ग्रामस्थ दूरावले गेले. मात्र 25वर्षानंतर गावातील जाणकार मंडळी एकत्र आली आणि वादावर विचार करुन कायमचा पडदा पाडण्यात आला. फुगणूस कातळवाडी 25वर्षांनी पुन्हा एकत्र आली असून वाडीतील अनेक कार्यक्रम आता एकजुटीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
फुणगूस कातळवाडीमधील कुणबी समाज हा विखुरलेला होता. शुल्लक कारणामुळे गावातील अनेकांची नाती तुटली होती. प्रत्येक जण हा आपले आपले कार्यक्रम करीत होता. मात्र हा कुणबी समाज एकत्र आला पाहिजे या विचार प्रेरणेतून कुणबी समाज अध्यक्ष सखाराम थुळ आणि कुणबी समाज संघटक कृष्णकांत डावल यांनी मार्गदर्शन करीत सर्वांना एकत्र आणले. कुणबी समाज कमिटीने यासाठी मेहनत घेत वाडीला एकत्र बसविले. त्यामुळे सर्वांच्या विचाऱयाने कातळवाडी पुन्हा एकत्र आली आहे.