जागतिक कसोटी चॅम्पियनशिप लढतीच्या पार्श्वभूमीवर किवीज कर्णधार केन विल्यम्सनचे प्रतिपादन
लंडन / वृत्तसंस्था
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम लढत रोमांचक असेल, आम्ही सर्व जण या लढतीबद्दल महत्त्वाकांक्षी आहोत, असे प्रतिपादन न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यम्सनने केले. भारत-न्यूझीलंड यांच्यात दि. 18 जूनपासून जागतिक कसोटी संघाची अंतिम लढत साऊदम्प्टन येथे खेळवली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विल्यम्सन बोलत होता.
‘आम्ही ज्या-ज्यावेळी भारताविरुद्ध खेळतो, ती प्रत्येक लढत आव्हानात्मक असते, हे सातत्याने जाणवते आणि आता तर ही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची फायनल असणार आहे. त्यामुळे, या लढतीचे महत्त्व खास असेल. ही लढत जिंकता आली तर त्यापेक्षा दुसरा आनंद नसेल’, असे 30 वर्षीय विल्यम्सनने एका व्हीडिओतून नमूद केले. आयसीसीने आपल्या ट्वीटर हँडलवर हा व्हीडिओ पोस्ट केला आहे. विल्यम्सन किवीज संघाचा अव्वल कर्णधार आहेच. शिवाय, आधुनिक क्रिकेटमधील विद्यमान सर्वोत्तम फलंदाजांमध्येही त्याचा आवर्जून समावेश होतो.
‘दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने जुगलबंदी रंगणार, हे साहजिक आहे. यापूर्वी, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका रोमांचक ठरली. त्याचप्रमाणे आमची पाकिस्तानविरुद्ध मालिकाही रंगतदार ठरली. अपेक्षित निकाल संपादन करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून खेळण्याची मजा वेगळी असते. अशा चुरशीच्या मालिकांदरम्यान त्याची प्रचिती येते’, असे विल्यम्सन पुढे म्हणाला.
खेळपट्टी बदलू शकते – वॅग्नर
न्यूझीलंडचा आघाडीचा जलद गोलंदाज नील वॅग्नरने भारतीय जलद गोलंदाज इंग्लिश हवामानाचा उत्तम लाभ घेण्याची क्षमता राखून आहेत, असे निरीक्षण येथे नोंदवले. ‘भारतीय संघात एकापेक्षा एक उत्तम जलद गोलंदाज आहेत आणि ते इंग्लंडमधील हवामानाचा पुरेपूर लाभ उठवू शकतात. मात्र, खेळपट्टी कोणत्याही क्षणी आपला स्वभाव बदलू शकते किंवा अगदी पाटा स्वरुपाची देखील होऊ शकते, ही बाब आपल्याला नजरेआड करुन चालणार नाही’, असे वॅग्नर म्हणाला.
न्यूझीलंड क्रिकेट संघ भारताविरुद्धच्या फायनल लढतीपूर्वी यजमान इंग्लंडविरुद्ध 2 कसोटी सामने देखील खेळणार असून ही मालिका दि. 2 जूनपासूनच सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, न्यूझीलंडचे बरेच खेळाडू एव्हाना इंग्लंडमध्ये पोहोचलेदेखील आहेत. भारतीय संघ अंतिम लढतीसाठी जूनच्या पहिल्या आठवडय़ात इंग्लिश भूमीत पोहोचेल, असे सध्याचे संकेत आहेत. त्यापूर्वी पूर्ण संघ मुंबईमध्ये हार्ड क्वारन्टाईन असणार आहे.
वृद्धिमान साहाची कोरोनावर मात, इंग्लंड दौऱयासाठी उपलब्ध
नवी दिल्ली ः भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाने कोरोनावर मात केली असून पुढील महिन्यातील इंग्लंड दौऱयासाठी तो उपलब्ध असणार आहे. साहा दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये क्वारन्टाईन पूर्ण केल्यानंतर कोलकातात आपल्या निवासस्थानी परतला आहे. आगामी इंग्लंड दौऱयाकरिता तंदुरुस्ती सिद्ध करण्याच्या अटीवर त्याची संघात निवड केली गेली आहे.
सध्या स्थगित केल्या गेलेल्या आयपीएल स्पर्धेत काही खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला, त्यात साहाचा समावेश होता. साहा त्या स्पर्धेत सनरायजर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करत होता. साहाला मुंबईत भारतीय संघाच्या बायो-बबलमध्ये समाविष्ट होण्यासाठी आणखी एक आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल आवश्यक असेल. यासाठी तो दोन दिवसांपूर्वी चाचणी करवून घेईल. चारच दिवसांपूर्वी साहाचे अहवाल संमिश्र स्वरुपाचे राहिले आणि त्यामुळे, त्याचे आयसोलेशन चार दिवसांनी वाढले होते.
न्यूझीलंड
ऑगस्ट 2019 ः श्रीलंकेविरुद्ध 1-1 ने बरोबरी
डिसेंबर-जाने. 2019-20 ः ऑस्ट्रेलियाविरुद्ध 0-3 फरकाने पराभव
फेब्रुवारी 2020 ः भारताविरुद्ध 2-0 फरकाने मालिकाविजय
डिसेंबर 2020 ः विंडीजविरुद्ध 2-0 फरकाने मालिकाविजय
डिसेंबर-जाने. 2020-21 ः पाकिस्तानविरुद्ध 2-0 फरकाने मालिकाविजय
भारत
ऑगस्ट 2019 ः विंडीजविरुद्ध 2-0 फरकाने मालिकाविजय
ऑक्टोबर 2019 ः द. आफ्रिकेविरुद्ध 3-0 फरकाने मालिकाविजय
नोव्हेंबर 2019 ः बांगलादेशविरुद्ध 2-0 फरकाने मालिकाविजय
फेब्रुवारी 2020 ः न्यूझीलंडविरुद्ध 0-2 फरकाने मालिकेत पराभव
डिसें-जाने. 2020-21 ः ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-1 फरकाने मालिकाविजय
मार्च 2021 ः इंग्लंडविरुद्ध 3-1 फरकाने मालिकाविजय