वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑलिम्पिक सहभागाची ‘शताब्दी’ साजरी करण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) नवे बोधचिन्ह स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी त्याचे अधिकृत अनावरण करण्याची योजना आखण्यात आली आहे.
भारतीय खेळाडूंच्या ऑलिम्पिक सहभागाची शंभर वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त आम्ही नवी ओळख स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सर्वांचे परिश्रम, खेळाडू व पदाधिकाऱयांच्या योगदानामुळेच टीम इंडिया निर्माण होऊ शकली. नवे बोधचिन्ह स्वीकारून आम्ही त्यांचा सन्मान केला आहे, असे आयओएने सांगितले. या संदर्भात आयओए अध्यक्ष नरिंदर बात्रा व सरचिटणीस राजीव मेहता यांनी निवेदनाद्वारे सांगितले की, ‘भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा नवा लोगो हा भारताचे प्रतीक आणि खेळातील महत्त्व अधोरेखित करणारा आहे. जागतिक स्पर्धांत टीम इंडियाचे ऍथलीट्स अभिमानाने तो प्रदर्शित करतील, असे त्याचे डिझाईन बनविण्यात आले असून त्यात राष्ट्रध्वजालाही स्थान देण्यात आले आहे,’ असेही त्यांनी म्हटले आहे.
आधीचा लोगो हा ब्रिटिश कालखंडातील होता आणि आयओएकडून तो आजपर्यंत वापरला जात होता. नव्या लोगोला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मान्यता दिली असून यावर्षीच्या 15 ऑगस्ट रोजी त्याचे खास पद्धतीने अनावरण करण्याची आयओएने योजना आखली आहे.