निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी, जिल्हा प्रशासनाकडून वेळास, बाणकोट, वाल्मिकीनगर, नारायणनगरात दक्षता
प्रतिनिधी/ मंडणगड
निसर्ग चक्रीवादळाच्या पाश्वभूमीवर तालुक्यातील अरबी समुद्र व सावित्री नदी किनाऱयावरील वेळास, बाणकोट, वाल्मिकीनगर, नारायणनगर या चार गावांमधील सुमारे 2500 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी देण्यात आले आहेत.
चारही गावे ही किनाऱयालगत असल्याने वादळाचा फटका या गावांतील नागरिकांना बसू शकतो. त्यामुळे प्रशासनाने वेळास येथील 713, वेळास नारायण नगर 466, वाल्मिकीनगर, 800, बाणकोट 500 नागरिकांना बाणकोट-बलदेववाडी येथील जिल्हा परिषद शाळा, आरोग्य केंद्रात सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याच्यादृष्टीने प्रशासन कार्यरत झाल्याची माहिती तहसील कार्यालयातून मिळाली आहे. मंगळवार व बुधवार या दोन दिवसांतील सुमारे चोवीस तास धोक्याचे असल्याने प्रशासन गतीमान झाले आहे.
आपत्ती व्यवस्थापनाकरिता तालुक्यातील 109 गावांमध्ये 69 कर्मचारी कार्यरत करण्यात आले आहेत. त्यामध्ये 36 ग्रामसेवक, 16 तलाठी, 17 कृषी सहाय्यक याचबरोबर बांधकाम विभाग, पंचायत समिती पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता मंडणगड बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत एन.डी.आर.एफ.ची 11 जवानांची तुकडी येथे दाखल होणार असल्याची माहितीही सुत्रानी दिली आहे.
वादळाचा फटका बसण्याची शक्यता असलेल्या वेळास, वाल्मिकीनगर, नारायण नगर, बाणकोट या गावांतील ग्रामस्थांना दोन तासांत गाव खाली करुन चोवीस तासांसाठी सुरक्षित स्थळी हलण्याच्या सूचना प्रशासनाच्यावतीने दिल्या गेल्यानंतर मंगळवारी नागरिकांत खळबळ उडाली. तालुक्याच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच युध्दपातळीवर काम करून सुरक्षित राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आल्याने ग्रामस्थ चिंताग्रस्त बनले आहेत.