एकाच दिवशी तब्बल 388 नवे रुग्ण : उडुपीत 150 तर गुलबर्ग्यात 110 जण : दिवसभरात 75 रुग्ण संसर्गमुक्त
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाचा कहर माजला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत मोठी भर पडत चालली आहे. पाचव्या लॉकडाऊनमध्ये बहुतेक सर्व क्षेत्रांना सूट देण्यात आलेली असतानाच वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब ठरत आहे. राज्यात मंगळवारी दिवसभरात तब्बल 388 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. उडुपी जिल्हय़ाने रुग्णसंख्येत बेंगळूर शहर जिल्हय़ाला मागे टाकले आहे. या जिल्हय़ात दिवसभरात 150 नवे रुग्ण आढळले. राज्यातील रुग्णसंख्या 3,796 वर पोहोचली असून 1,403 जण बरे झाले आहेत.
राज्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण मंगळवारी सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे 388 रुग्णांपैकी 363 जण महाराष्ट्रातून परतलेले आहेत. तर चौघे दिल्लीतून आलेले आहेत. रोजगारानिमित्त परराज्यात स्थायिक झालेले अनेक जण कर्नाटकात परतले आहेत. त्यामुळे त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात अडथळे येत असल्याने क्वारंटाईनचा कालावधी कमी करण्यात आला होता. 7 दिवसांचे संस्थात्मक क्वारंटाईन पूर्ण केल्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि, होम क्वारंटाईनमध्ये असतानाच अनेक जण कोरोनाचे पॉझिटिव्ह आढळत आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण आणणे राज्य सरकारपुढे मोठे आव्हान ठरत आहे.
मागील 24 तासांत उडुपी जिल्हय़ात सर्वाधिक 150, गुलबर्गा जिल्हय़ात 100, बेळगाव जिल्हय़ात 51, रायचूर 16, बेंगळूर शहर 12, बिदर 10, बागलकोट व हासन जिल्हय़ात प्रत्येकी 9, दावणगेरे 7, यादगिर 5, विजापूर आणि मंडय़ा जिल्हय़ात प्रत्येकी 4, बेंगळूर ग्रामीणमध्ये 3, चिक्कबळ्ळापूर, धारवाड व तुमकूरमध्ये प्रत्येकी 2 तसेच कोलार, हावेरी जिल्हय़ात प्रत्येकी 1 नवा रुग्ण आढळून आला आहे.
बेंगळूर शहरातील रुग्णसंख्या 405 इतकी असून उडुपी जिल्हय़ात 410 इतके रुग्ण आहेत. या जिल्हय़ातील 367 रुग्ण हे आंतरराज्य प्रवास करून परतलेले आहेत.