ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्यातील मंत्रालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्रालयात चक्क दारूच्या बाटल्या सापडल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात आता विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील महाविकासाआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारी ही घटना आहे, असे म्हणत दरेकर यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी देखील केली आहे.
मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्या सापडणे अत्यंत दुर्दैवी, चीड आणणारी आणि शरम आणणारी अशी घटना आहे. राज्यामध्ये कोविड परिस्थिति बरोबर पूरग्रस्त परिस्थिती आहे. एका बाजूला मंत्रालयामध्ये सर्वसामान्य लोकांना प्रवेश मिळणे आपल्या न्यायहक्कासाठी दुरापास्त असताना दारूच्या बाटल्या मंत्रालयांमध्ये कशा पोहचू शकतात? असा सवाल दरेकरांना केला आहे.
यासोबतच दारूच्या बाटल्या मंत्रालायामध्ये कोणी आणल्या आणि कशासाठी आणल्या? या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, संबंधितांवर कारवाई झालीचं पाहिजे. या प्रकरणावरून सरकारची मानसिकता, सरकारचा कारभार कोणासाठी, कशासाठी चालला आहे हे दिसून येत आहे. हे सरकार नेमके कोणासाठी काम करीत आहे. धनदांडग्यांसाठी करतंय, दारू विपेतयांसाठी करतंय, डान्स बार वाल्यांसाठी किंवा रेस्टोरंट वाल्यांसाठी काम करत आहे, की सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करतंय हे एकदा जनतेला कळलं पाहिजे असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान, सर्वसामान्यांना तपासणी शिवाय सहजासहजी प्रवेश न मिळणाऱया राज्याच्या मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच आढळल्याची बातमी समोर आली होती. मंत्रालयातील मुख्य भाग असलेल्या त्रिमुर्तीच्या मागील बाजूस दारूच्या बाटल्यांचा खच कॅमेऱयात कैद झाला असल्याचे दाखवले गेले आहे. हा प्रकर समोर आल्यानंततर एकच खळबळ उडाली असून, मंत्रालयात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले असताना व तपसाणी केली जात असातनाही, एवढ्या दारूच्या बाटल्या आल्या कशा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच, या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल आणि हे कृत्य करणाऱया दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली असल्याचे सांगण्यात आले आहे.