ऑनलाइन टीम / मुंबई :
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. यामध्ये शिवसेनेमध्ये सर्वाधिक नाराजी दिसून येत आहे. मंत्रिपद न मिळाल्याने सेनेचे किमान 14 आमदार नाराज असल्याचे कळते. हे सर्व आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली नाराजी त्यांच्यापुढे मांडणार आहेत.
दरम्यान, मंत्रिपदाचा अनुभव असलेले दिवाकर रावते, रामदास कदम, भास्कर जाधव, रविंद्र वायकर, दीपक केसरकर, तानाजी सावंत यांसारख्या चेहऱयांना वगळून उद्धव ठाकरे यांनी नव्या चेहऱयांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या स्थापनेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका निभावली मात्र, त्यांचे बंधू सुनील राऊत यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने राऊत बंधू नाराज असल्याची चर्चा असली तरी नाराजीचे वृत्त दोघांनीही फेटाळले आहे.