‘विकासकामांकडे लक्ष न देता माजी आमदारांची उणी-दुणी काढणे संयुक्तिक नव्हे’
प्रतिनिधी / काणकोण
कोणत्याही मतदारसंघाचा विकास ही सतत चालू राहणारी प्रक्रिया असते. कोणताही प्रकल्प एक-दोन वर्षांत पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. त्या कामाला प्रशासकीय मंजुरी, आर्थिक मंजुरीची गरज असते. त्यासाठी वर्षे जातात. त्याचबरोबर एखाद्या लोकप्रतिनिधीने सुरू केलेला प्रकल्प त्याच्या कारकिर्दीत पूर्ण होतोच असे नाही. अशा वेळी विकासकामांकडे लक्ष न देता माजी आमदारांची उणी-दुणी काढणे संयुक्तिक नसल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री रमेश तवडकर यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या कारकिर्दीत जनार्दन भंडारी हे पैंगीणचे सरपंच असताना 18 लाख रु. खर्च करून पोटके मैदानाचे सपाटीकरण करण्यात आले होते. जागेचा प्रश्न जर सुटला नसता, तर सरकारने एवढी रक्कम कशाच्या भरवशावर खर्च केली, असा सवाल तवडकर यांनी केला. चावडीवरील कृषी घराची सुरुवातीला 50 लाखांची निविदा काढण्यात आली होती. आपण त्यात बदल करून घेतला. त्यामुळे काम लांबणीवर पडले. सध्या उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी ज्या कामाची पायाभरणी केलेली आहे ती फाईल आपल्याच कारकिर्दीत पुढे गेली होती, असे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या बदनामीपेक्षा कामांकडे लक्ष द्या
चावडीवरील रवींद्र भवन प्रकल्पासाठी क्रीडा खात्याकडे असलेली जमीन आपण क्रीडामंत्री असल्यामुळे कला व संस्कृती खात्याकडे जाऊ शकली. या प्रकल्पाच्या कामाला आपल्या कारकिर्दीतच सुरुवात झाली होती. मतदारसंघातील रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या नित्य होणाऱया गोष्टी आहेत. आपण गावणे धरणाच्या कामाला चालना दिली. ते काम पुढे नेणे हे विद्यमान आमदाराचे काम आहे. रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण असो अथवा एखाद्या प्रकल्पाची पायाभरणी असो, त्यावेळी आपली बदनामी करून टाळय़ा घेणे त्यांनी सोडून द्यावे आणि मतदारसंघाच्या विकासकामांकडे अधिक लक्ष द्यावे, असा सल्ला तवडकर यांनी उपसभापती फर्नांडिस यांना दिला आहे.
येणाऱया जिल्हा पंचायत निवडणुकीकरिता पैंगीण मतदारसंघातून शोभना वेळीप, तर खोल मतदारसंघातून शाणू वेळीप हे पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांच्या विजयासाठी काम करणे प्रत्येक भाजप कार्यकर्त्याचे कर्तव्य असेल. त्याचप्रमाणे पालिका निवडणुकीत देखील भाजपाच्या कार्यकर्त्यांनाच प्राधान्य दिले जाईल. त्यासाठी संघटितरीत्या काम करायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले.