मलप्रभा नदी घाटाचे आज नामांतर : कै. प्रल्हाद रेमाणींच्या स्वप्नातील मलप्रभा नदी घाटाच्या दुसऱया टप्प्यातील कामाच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे
प्रतिनिधी / खानापूर
येथील मलप्रभा नदीघाट सेवा समितीतर्फे मलप्रभा नदीघाटाचे माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी मलप्रभा नदीघाट असे नामांतर आज दि. 16 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम विधानपरिषद सदस्य महंतेश कवटगीमठ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खानापूरचे नगराध्यक्ष मजहर खानापुरी, उपनगराध्यक्ष लक्ष्मी अंकलगी, स्थायी कमिटी अध्यक्ष लक्ष्मण मादारसह इतर नगरसेवक व मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. आता नामांतर करुन होणार नसून कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या स्वप्नातील मलप्रभा नदीघाट दुसऱया टप्प्यातील कामाच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी महंतेश कवटगीमठ यांनीच पुढाकार घेऊन दुसऱया टप्प्यातील मलप्रभा नदीघाट विकासासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर करुन घ्यावा, अशी जनतेची अपेक्षा आहे.
मलप्रभा नदीघाट खऱया अर्थाने कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या प्रयत्नातूनच विकसित झाला. त्या घाटाजवळील नवीन पुलवजा बंधारा उभारणीसाठी देखील त्यांचेच प्रयत्न कारणीभूत आहेत. यामुळेच रेमाणींच्या निधनानंतर शिवस्मारकात झालेल्या सर्व पक्षीय शोकसभेत मलप्रभा नदीघाटाला त्यांचे नाव देण्याचा ठराव माजी नगराध्यक्ष कै. रफिक खानापुरी यांनीच मांडला होता. व त्याला सर्वपक्षीयानी एकमुखी पाठिंबा दिला होता. एवढेच नव्हे तर नगरपंचायत बैठकीत देखील त्याला मंजुरी देण्यात आली होती. आता त्यांच्या तृतीय स्मृतिदिनाच्या निमित्ताने नामकरण सोहळा पार पडत आहे. याचवेळी दुसऱया टप्प्यातील काम पूर्णत्वाला नेण्यासाठी निर्धार करणे हे देखील खऱया अर्थाने योग्य ठरणार आहे.
मलप्रभा नदीघाट बांधकामासाठी रेमाणी यांच्या प्रयत्नातूनच 9 कोटी रु. ची योजना दोन टप्प्यात तयार केली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 4 कोटी रु. मंजूर झाले आणि त्या कामाची पूर्तता होऊन 9 वर्षाचा कालावधी लोटला. तरीदेखील दुसऱया टप्प्यातील कामासाठी अद्याप निधी मंजूर झाला नाही.
मलप्रभा नदीवर स्नानासाठी येणाऱया भाविकांची संख्याही मोठी आहे. पूर्वी स्नानासाठी येणाऱया भाविकांना नदी काठावर कोणत्याही मूलभूत सुविधा नव्हत्या. एवढेच नव्हे तर स्नान करण्यासाठी देखील योग्य वातावरण नव्हते. मलप्रभा नदीचे पावित्र्य लक्षात घेऊन या ठिकाणी घाटाचे बांधकाम झाले पाहिजे. अशी बऱयाच दिवसाची मागणी होती. यामुळे 1996 च्या सुमारास मलप्रभा नदीघाट बांधकाम कमिटीची स्थापना होऊन नदी काठावर घाट बांधण्याचा संकल्प केला. यासाठी आवश्यक निधी जमवण्यास प्रारंभ झाला. स्नानासाठी येणाऱया भाविकांनीदेखील यासाठी देणग्या दिल्या. एवढेच नव्हे तर काही दानशूर भाविकांनीदेखील घाट बांधकामास हातभार लावला. यासाठी मलप्रभा नदीघाट बांधकाम कमिटी तसेच इतर अनेकांनी श्रमदानही केले. खासदार फंडातून 3.50 लाख रु. चा निधीही मंजूर केला. या सर्व निधीमधून केवळ सहा वर्षात टप्याटप्याने महादेव मंदिरापासून जुन्या पुलापर्यंत घाट बांधकाम केले. बांधकामामुळे मलप्रभा नदी काठाला एकप्रकारचे सौदर्य निर्माण झाले. तसेच स्नानासाठी येणाऱया भाविकांचीही चांगलीच सोय झाली.
दोन्ही बाजूला घाटाचे बांधकाम व्हावे
घाट बांधकामात सुधारणा करुन मलप्रभा नदी काठाच्या दोन्ही बाजूला तसेच पूर्वीच्या जुन्या व आताच्या नवीन पूलवजा बांधाऱयाच्या पलीकडील दोन्ही बाजूला घाटाचे बांधकाम व्हावे तसेच भाविकांच्यासाठी इतर सोयी व्हाव्यात, नदीकाठच्या सौंदर्यात भर पडावी, या उद्देशाने 2009 साली घाट बांधकामाचा नवीन आराखडा तयार केला होता. यासाठी तत्कालीन आमदार प्रल्हाद रेमाणी यांनी राज्य शासनाकडून 4 कोटी रु. चा निधी मंजूर करुन आणला होता. यावेळी तयार केलेला एकूण आराखडा 9 कोटी रु. चा होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात पुलाच्या अलीकडील बाजूस दोन्ही बाजूला घाट बांधकाम, महिलांना कपडे बदलण्यासाठी व्यवस्था, पंचमुखी महादेव परिसराची सुधारणा यासारख्या योजनांचा समावेश होता. दीड वर्षाच्या कालावधीत पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण होऊन दोन्ही बाजूचा घाट भाविकांसाठी समर्पित
केला.
अंत्यविधीसाठी मोक्षधाम, धार्मिक विधीसाठी इमारतीची गरज
साहजिकच घाटावर भाविकांची तसेच फिरायला येणाऱया लोकांची गर्दी वाढतच चालली आहे. आता गरज आहे ती दुसऱया टप्प्यातील बांधकामाची. पुलाच्या पलीकडील बाजूस दोन्ही बाजूला घाटाचे बांधकाम करुन एका बाजूच्या घाटावर अंत्यविधीसाठी मोक्षधाम तसेच धार्मिक विधीसाठी इमारत तर दुसऱया बाजूच्या घाटावर कपडे धुण्याची व्यवस्था असे उद्दिष्ठ आहे. तसेच संपूर्ण घाटाच्या दोन्ही बाजूला विद्युतरोषणाई, बगीच्या आदींचाही त्यामध्ये समावेश आहे. या दुसऱया टप्प्यातील कामासाठी देखील चार ते पाच कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. हा निधी मंजूर झाल्यास दुसऱया टप्प्यातील कामही पूर्ण करुन मलप्रभा नदी परिसराला अधिकच महत्त्व येणार आहे. सध्या घाटाच्या ठिकाणी कपडे धुतले जातात. यामुळे पाणी दूषित होते. तेथे स्नान करणे कठीण जात आहे. यामुळे कपडे धुण्यासाठी स्वतंत्र धोबी घाटाची गरज
आहे.
दुसऱया टप्प्यातील योजनेत धार्मिक विधीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. शिवाय शहरातील जास्तीत जास्त भागातील मृत व्यक्तींचा अंत्यविधी मलप्रभा काठावरच करण्याची पूर्वांपार प्रथा आहे. पण त्या ठिकाणी मोक्षधाम नसल्याने विशेषतः पावसाळय़ात अंत्यविधी उरकणे कठीण जाते.
आमदारांनी पाठपुरावा करावा
मलप्रभा नदीघाट बांधकाम समितीने राज्य शासनाला वेळोवेळी निवेदनेही पाठविली आहेत. आता पुन्हा बदलत्या राजकीय परिस्थितीत तालुक्याच्या आमदार अंजली निंबाळकर तसेच विधानपरिषद सदस्य महंतेश कवटगीमठ यांनी याचा पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन मलप्रभा नदी घाटाच्या दुसऱया टप्प्यातील कामाला तत्काळ मंजुरी देवून आवश्यक निधी द्यावा, अशी मागणी होत आहे.
आता माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी मलप्रभा नदीघाट नामांतराचे औचित्य साधून दुसऱया टप्प्यातील कामाच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.