वार्ताहर / कास
महाबळेश्वर शहर वगळता हा तालुका दऱ्याखोऱ्यांनी नटलेल्या अतिदुर्गमच असुन या तालुक्यातील दुर्गम दुधगावातील शेतकरी कुटुंबातील कुलदीप यादव या मुलाने कठोर परिश्रम घेत भारती विदयापीठ पुणे युनिवर्सिटी येथुन समाज कार्य या विषयातील पीएचडी या पदवीला गवसणी घातली आहे.
कुलदिप शिवराम यादव यांनी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स स्टडीज अँड रिसर्च सेंटर, पुणे येथून ‘सोशल वर्क’ या शाखेची सर्वोच्च अशी ‘ डॉक्टर ऑफ फिलोसॉफी ’ (Ph.D) हि पदवी प्राप्त केली. या पदवीसाठी त्यांनी “ A STUDY OF YOUTH ADDCTION IN PUNE CITY AND ITS IMPACT ON THEIR QULITY OF LIFE ” या विषयाचा प्रबंध विख्यात अशा भारती विद्यापीठ युनिवर्सिटी, पुणे येथे सादर केला.
त्यापुर्वी त्यांनी ‘एम.एस.डब्ल्यू’ आणि ‘एम.फील’ या पदव्युत्तर पदव्या संपादन केलेल्या आहेत. सदर संशोधन कार्यासाठी त्यांना गाईड म्हणून डॉ.बी.टि.लावणी, डॉ.जी.आर.राठोड, डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
महाबळेश्वर व जावली तालुक्याततील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार, कला, क्रीडा आणि फुले -शाहू – आंबेडकरी पुरोगामी चळवळ या क्षेत्रात अल्पावधीतच त्यांनी अमीट व उत्तुंग ठसा उमटवला. त्यांच्या अनेक समाजउपयोगी उपक्रमामुळे गोर -गरीब आणि अडचणीत असलेल्या लोकांना करत असलेल्या मदतीबद्दल यापुर्वी त्यांना बंधुत्व प्रतिष्ठानचा ‘राज्यस्तरीय युवारत्न पुरस्कार’ आणि आदर्श फाउंडेशनचा ‘नॅशनल युनिटी अवॉर्ड’ आणि सध्याच्या जागतिक महामारी कोरोनाच्या काळात भारती हास्पिटलमध्ये बजावलेल्या पेशंटच्या सेवेबद्दल मुंबईच्या साप्ताहिक धगधगती मुंबई यांच्यावतीने ‘कोव्हीड योद्धा’ अश्या अनेक सन्मानाने आतापर्यंत सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांच्या आजच्या या यशाबद्दल तालुक्यातुन सर्वत्र अभिमान व्यक्त केला जात आहे.