मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
पणजी /प्रतिनिधी
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महाराष्ट्र सरकारने गोव्यातून येणाऱया प्रवाशांचा चाचणी अहवाल घेतल्याशिवाय त्यांना प्रवेश दिला जाणार नाही ही अशी जी भूमिका घेतली आहे, त्याबाबत आम्ही प्रत्युत्तर देणार नसल्याचे स्पष्ट केले.
‘तरुण भारत’शी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की गोवा हे पर्यटन राज्य आहे. इथे देश-विदेशातून मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. आम्ही येणाऱया पर्यटकांचा मान राखणार आहोत. त्याचबरोबर आमच्या नव्या नियमानुसार येणाऱया प्रत्येक पर्यटकाची तपासणी होईलच, शिवाय त्यांना सक्तीने मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. आजपासून मास्क न वापरणाऱयांना किमान दंड रु 100 वरून रु. 200 केला आहे. महाराष्ट्राने आजपासून चार राज्यातून येणाऱया प्रवाशांची तपासणी आणि कोरोनाचा अहवाल नकारात्मक आल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही असे जाहीर केलेले असले तरी गोवा सरकार त्याला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देऊ इच्छित नाही. गोव्यामध्ये मोठय़ा प्रमाणात त्यामुळे पर्यटक येतील, याउलट महाराष्ट्रात जाणाऱया पर्यटकांची संख्या आपसूकच कमी होईल. त्यात नुकसान महाराष्ट्राचे होईल त्यामुळे असे निर्णय घेत असताना फार गंभीर करणे विचार करणे आवश्यक असते. गोवा सरकार सध्याच्या परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे आणि सध्या कोरोना रुगणांची संख्या गोव्यात कमी झालेली आहे. त्यामुळे विविध राज्यातून येणाऱया पर्यटनातून गोव्यात कोरोना वाढीस जाता कामा नये यासाठी आवश्यक ते सर्व उपाय आणि योजना हाती घेतलेल्या आहेत, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.